आत्मसंवाद ही व्यक्तीच्या विकासात महत्त्वाची बाब. समाजजीवनातील बदलांची वाट व्यक्तीच्या मनोव्यापारातून जाते; म्हणून जगाच्या बदलापेक्षा व्यक्तीच्या मनोव्यवहारात आधी बदल अपेक्षित ठरतो. बदलाची सुरुवात व्यक्तीने स्वतःच्या मनोभूमिकेपासून केली तर अंतिमतः जग सुंदर दिसते. जग बदलणाऱ्या व्यक्तींची जीवनचरित्रे पाहिलीत तर लक्षात येते की महापुरुषांनी बदलांचे प्रयोग जगासाठी नाही, तर स्वतःवर केले होते; नंतर ते जगन्मान्य झाले.
उदाहरणार्थ गौतम बुद्ध , महात्मा गांधी, ज्ञानोबा-तुकोबा ही संतमंडळी. अर्थातच ‘व्यक्तीकडून समष्टीकडे’ जाण्याचा मार्ग आत्मसंवादाच्या सेतूवरून जातो. म्हणून आपला स्वतःच्याच मनासी नितळ, निरपेक्ष संवाद कायम असायला हवा. ‘तुका म्हणे होय, मनासी संवाद। आपुलाची वाद, आपणासी॥’
अध्यात्माचे मुख्य सूत्र हेही व्यक्तीच्या ‘अंतरीचे’ बदल, शुद्धता हेच होय. व्यक्तीने स्वतःत बदल घडवून आणून स्वविकसनाची प्रक्रिया साध्य करणे हाच प्रभावी मार्ग ठरतो. तसे तर आज सामाजिक पातळीवर व्यक्तीविकासाचे अनेक मार्ग आहेत. त्यात धर्म, शिक्षण अधिक चर्चित होत. परंतु समकाळ पाहिला तर शिक्षण व धर्माकडून व्यक्तीविकास घडतो! शंकेस वाव आहे; कारण शिक्षित आणि धार्मिक व्यक्तींचा आजचा सामाजिक वर्तनव्यवहार. मग अशाही काळात बाह्य संस्काराऐवजी आत्मचिंतन प्रभावी घटक मानून स्वतःवर प्रयोग करणे हिताचे ठरते. आत्मचिंतनाने बंध, मोक्ष, स्वर्ग, नर्क, माया, प्रारब्ध, संचित वगैरे समजुती विरतात. शोक, मोह, द्वेष इत्यादींचा वाईट प्रभाव संपून मन अंतर्बाह्य शुद्ध होते.
सरे शुद्ध साचे। अंतरीचे बीज तें॥
तुका म्हणे लवण कळी। पडतां जळी तें होय॥
प्रेम, निःस्वार्थता, चारित्र्य आणि प्रामाणिकपणा या चतुःसूत्रीवर आधारित आत्मचिंतनाने व्यक्तीची नैतिक उंची वाढीस लागते. सामाजिक स्तरावर ‘देशकाल परिस्थिती’ ही व्यक्ती विकासात महत्त्वपूर्ण गणली जाते, परंतु मूलतः व्यक्ती बदलाची ही प्रक्रिया अंतरीचीच. म्हणून बाह्य घटकांपेक्षा आत्मचिंतन आणि आत्मसंवाद माणसांत प्रभावी बदल घडवून आणू शकतो.

