Pune News: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा उतृकृष्ट अध्ययन केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. पण आता केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार हे केंद्र स्वत: पुण्यात उभारणार आहे.

राज्य सरकार स्वत: हे केंद्र पुण्यात सुरू करणार
‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या योजनेतील भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्रासाठी (सेंटर ऑफ एक्सलन्स) केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, आता केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार स्वत: हे केंद्र पुण्यात सुरू करणार आहे,’ अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ‘पुढील पाच ते सहा महिन्यांत या प्रकल्पाला सुरुवात होईल,’ असे त्यांनी सांगितले.
मराठीला तीन ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात दर्जा जाहीर
किमान दोन हजार वर्षांचा इतिहास आणि मूलतः अभिजात मराठीला केंद्र सरकारने तीन ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात दर्जा जाहीर केला. अभिजात भाषा निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केल्यानंतर राज्य सरकारने या योजनेतील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’साठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला. त्याला मान्यता मिळाल्यानंतर निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार होता.
या केंद्रासोबत मराठी विकास केंद्र जोडण्यात येणार
या केंद्राबाबत आणि निधीबाबत विचारलेल्या प्रश्नावर सामंत म्हणाले, ‘केंद्र सरकारने अभिजात दर्जा दिलेल्या भाषांना किती निधी दिला, याचा आढावा घेतला आहे. संस्कृतसाठी रामटेक येथील कालिदास विद्यापीठाला निधी मिळाला आहे. मात्र, या निधीची वाट न पाहता पुण्यात मराठी भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र उभारण्याचा निर्णय भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. या केंद्रासोबत मराठी विकास केंद्र जोडण्यात येणार आहे.’
Nagpur News : कामासाठी बाहेर निघाले, दोन्ही लेक गेल्याची बातमी आई-बापाच्या कानावर; रेल्वेच्या धडकेत सख्ख्या भावांचा हृदयद्रावक अंत
‘राज्यात केवळ मराठी भाषा सक्तीची असावी, ही राज्य सरकारची भूमिका आहे. पहिलीपासून हिंदी सक्तीचे धोरण आधीच्या सरकारच्या काळातील आहे,’ अशी टिप्पणी त्यांनी केली
कुसुमाग्रज अध्यासन केंद्र
‘दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर ‘जेएनयू’मध्ये ‘एम. ए.’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, वर्षभरात विद्यापीठाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे,’ अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

