Nashik News: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाटच्या ग्रामस्थांनी कष्टाने निसर्गाच संवर्धन करत रोजगाराची पेरणी केली. २९२ हेक्टर वनक्षेत्राचे संवर्धन करताना १० हेक्टर क्षेत्रात काजू उत्पादन सुरू केले.

आणि काजूची वनराई बहरत गेली
वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्या पथकाच्या नेतृत्त्वात सध्या संवर्धन सुरू आहे. वनपाल सचिन दिवाणे, वनरक्षक खंडू दळवी यांचे पथक तेथे लक्ष ठेऊन आहेत. ग्रामस्थांनी पाड्यालगत चर खणल्यानंतर काजूची वनराई बहरत गेली आणि हळूहळू काजू विक्रीतून होणारा नफा ग्रामस्थांची उमेद वाढविणारा ठरला. तेव्हापासून १० हेक्टर व्यतिरिक्त जंगलातही काजू व आंब्याचे बीज रोपण ग्रामस्थांनी सुरू केले.
काजूपार्क
त्यामुळे निसर्गाला ‘काजूपार्क’ नाव देण्यात आले. विविध प्रजातीच्या वृक्षांनी नटलेल्या जंगलात बिबट्या, मोर, तरस, रानडुक्कर यासह अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. पाड्यावरील सर्व ग्रामस्थांच्या श्रमदानातून दुर्गम भागातील निसर्गाचे संवर्धन होण्यासह स्वयंविकासासाठीही निसर्गाची देणगी महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत समिती सदस्यांनी व्यक्त केले.
पर्यटकांना थेट विक्री
मार्च-एप्रिल महिन्यात काजू घोटीच्या बाजारपेठेत ग्रामस्थ विक्री करतात. त्यातून येणारे उत्पन्न समितीच्या खात्यावर जमा होते. त्यानंतर एकत्रित उत्पन्नाचे भाग करून ग्रामस्थांना पैसे मिळतात. दुसरीकडे पाड्यावरील हिरवाई पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मधुर आंब्याची थेट विक्री केली जाते. त्यातूनही उत्पन्नात भर पडत असल्याने काजू पाठोपाठ आमराई फुलविण्याचा प्रयत्न निसर्ग संवर्धनासाठी कौतुकास्पद आहे.
काजूच्या रोपांची लागवड पंधरा वर्षापूर्वी
“श्रीघाट पाड्यालगत असलेल्या राखीव वनात अवैध वृक्षतोड, अतिक्रमण, वनवणवा रोखणे यासह चराई बंदी ,कुऱ्हाड बंदीची कठोर अंमलबजावणी केली जाते.ग्रामस्थांच्या श्रमदानातून हजारोंच्या संख्येने काजूच्या रोपांची लागवड पंधरा वर्षापूर्वी केल्याने संवर्धनासह वन्यजीव सुरक्षा वाढली आहे.”
अशी प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वर चे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी दिली.
१७ वर्षाच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून वनक्षेत्राचे संवर्धन
गावाजवळ बहरलेल्या जंगलाच्या रक्षणासाठी पुढाकार घेताना आर्थिक विकासाचीहीवाट शोधणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाटाच्या ग्रामस्थांनी काजूपार्क चा अभिनव प्रयोग साकारला आहे.१७ वर्षाच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून २९२ हेक्टर वनक्षेत्राचे संवर्धन करताना १० हेक्टर क्षेत्रात काजू उत्पादन सुरू झाले आहे. दुर्गम भागातही निसर्गसंवर्धन आणि व्यवसायवृध्दी यांचा समतोल साधत ग्रामस्थांनी शाश्वत विकासाचा आदर्श उभा केला.

