Headlines

CM devendra fadnavis reaction on police threatening students in mumbai action taken after controversy; मुंबईत विद्यार्थ्यांना पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाला दणका, व्हिडिओची मुख्यमंत्र्यांकडून दखल


मुंबई: नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने धमकी दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. “पुन्हा या परिसरात दिसला तर माझ्यासारखा बेकार माणूस नाही. मी तुमच्या खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन. त्यानंतर मग जामीनही मिळणार नाही,” अशी धमकी सदर पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना दिल्याचं व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओवरून पोलिसांच्या गजब कारभाराचे वाभाडे काढले जाऊ लागल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अखेर प्रतिक्रिया देत सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विद्यार्थी आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना मुंबई पोलिसांच्या वादग्रस्त व्हिडिओविषयी विचारलं असता ते म्हणाले की, “एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची पुष्टी केली जात आहे. मात्र चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलं आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “दुर्दैवाने काही लोकं या आंदोलनात ज्या प्रकारे दगडफेक करत होते, पोलिसांवर हल्ले करते, हे लोक कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आले नव्हते,” असं ते म्हणाले.

विरोधकांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी आंदोलनावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी यांच्यासहित सर्व विरोधी पक्षांना माझं आव्हान आहे की पळपुटेपणा सोडा आणि संसदेत चर्चेला सामोरे जा. विद्यार्थ्यांचे तुम्ही खरे कैवारी असाल तर हिंमत दाखवा. लोकशाहीत निर्णय रस्त्यावर होत नाही, तो संसदेत होतो. तुम्हाला जर देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा. उत्तरे पाहिजे असतील तर संसदेत मागा. तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारला मजबूर करा. पण आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोतोपरी ठेवलं आहे,” असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

राज-उद्धव ठाकरेंवर पलटवार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन २६ तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. यावरून पलटवार करताना मुख्यमंत्री म्हणाले, “या राज्यातील सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना झाला. आयएएस अधिकाऱ्यांपासून सगळे त्यात सामील होते. इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात कधीही झाला नव्हता. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्‍यांवरही याबाबत आरोप झाले होते. तेव्हा फक्त पेपर लीक झाले नाहीत तर जे नापास होते, त्यांना पास करण्याचा प्रकारही त्यांच्याच काळात झाला. आम्ही तर टीईटी परीक्षेत घोटाळा होतोय, हे लक्षात येताच परीक्षा होण्याआधीच घोटाळा करणाऱ्यांना पकडलं आणि त्यांच्यावर कारवाईही केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहायचं वाकून, हे बंद करा,” असा हल्लाबोल मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे.