Headlines

Devendra fadnavis supports delhi police lathicharge makes serious allegations against cjp jantar mantar student protesters; दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जचं समर्थन, आंदोलकांवर गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीस CJP आंदोलनावर काय-काय म्हणाले


मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर काल दिल्ली पोलिसांनी आक्रमकपणे लाठीचार्ज केला. शांततेत आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही पोलिसांनी लाठ्याकाठ्यांना झोडपून काढल्याने पोलीस प्रशासन आणि केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पोलिसांचं समर्थन करत पोलिसांनी मोठा संयम दाखवला असून अशा प्रकारचं आंदोलन योग्य पद्धतीने होण्यासाठी जेवढी कारवाई करणं गरजेचं असतं ती कारवाई पोलिसांनी केली आहे, असं म्हणत पोलिसांची बाजू घेतली आहे. तसंच कोणत्याही सरकारला आपल्या जनतेवर लाठीचार्ज करणं, हे कधीच आवडत नाही. पण काल आपण बघितलं असेल तर काल पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक गोष्टी तिथं घडल्या असत्या, असा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

नवी दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनावर भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. फक्त संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबतच संविधानाने सोपवलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्वक आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनांना पोलिसांकडून परवानगीही दिली जाईल आणि अशी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र जाणीवपूर्वक राजकीय अस्थिरता निर्माण करण्याकरता विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे हो योग्य नाही. अशा लोकांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल,” असं ते म्हणाले.

“आपण कोणतंही आंदोलन बघितलं तर ज्यावेळी आंदोलनाला चेहरा नसतो, तेव्हा काही वेगळ्या प्रवृत्ती त्या आंदोलनात घुसत असतात. अशा प्रवृत्ती आंदोलनांचा फायदा घेऊन, आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले स्वार्थ कसे पूर्ण करता येतील, याचा प्रयत्न करत असतात. दिल्लीमध्ये काल आंदोलन झालं, त्यामध्येही अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत,” असा हल्लाबोलही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

आंदोलकांसह राजकीय पक्षांवर गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील आंदोलनावर बोलताना आंदोलक विद्यार्थी आणि आंदोलनात सहभागी असलेल्या राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला आहे. “अनेक अशा संघटना ज्या संघटनांचा या विषयाशी कसलाही संबंध नाही, त्या संघटनाही अराजकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्लीत जे आंदोलन झालं ते नेतृत्वहीन होतं, त्यामुळे पोलिसांच्या गाड्या फोडणं, दगडफेक करणं, अशा घटना घडल्या. मी सर्व आंदोलकांवर आरोप करत नाही, यात प्रामाणिकपणे आंदोलन करणारे विद्यार्थीही असतील, मात्र या आंदोलनाच्या खोलात आपण गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, यामध्ये ज्यांचा नीट परीक्षेशी काही संबंध नाही, असेही लोक घुसले होते. त्यांना अराजकता निर्माण करायची होती,” असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.