Headlines

हिंदीला वेब सीरिजला टक्कर देणारी ‘सौभाग्यवती सरपंच’


वेब सीरिजविश्वानं गावाकडच्या गोष्टींकडे मोर्चा वळवला आहे, ही बाब काही नवीन नाही. यात देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये घडणाऱ्या कथांचं जास्त प्रमाण आहे. कारण तेथील पार्श्वभूमी दाखवणाऱ्या कथांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पण या सगळ्यातही महाराष्ट्राच्या मातीत घडणारी एक सीरिज उजवी ठरत आहे; ती म्हणजे ‘ सौभाग्यवती सरपंच ‘. एका खेडेगावतील महिला सरपंच होते आणि गावाच्या विकासासाठी कशी झटते, हे सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आलं आहे. आता त्या महिला सरपंचचा पुढचा प्रवास ‘सौभाग्यवती सरपंच २’मध्ये पाहायला मिळत आहे.

डोनगाव बुद्रुकची सरपंच अवली भुसळे ( देविका दफ्तरदार) ही कुटुंबाला सांभाळत गावाच्या विकासावर लक्ष केंद्रित करत असते. तिचा नवरा आणि गावाचा माजी सरपंच दादाराव भुसळे हा कधी पत्नीला मदत करतो, तर कधी तिच्या वाटेत काटे पेरतो. गावाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा कसा होईल ? हा मोठा प्रश्न अवलीसमोर असतो. त्यासाठी तिला मोठा लढा द्यावा लागतो. अण्णा (नागेश भोसले) गावातून पळून गेल्यानंतर अवलीसमोर नाना (मिलिंद शिंदे) हा कट्टर विरोधक उभा राहतो. या व्यक्तीमुळे अवलीचं वैयक्तिक आयुष्यही ढवळून निघतं. एका व्यक्तीची कमतरता म्हणून की काय, अधूनमधून ऐश्वर्या (अश्विनी कुलकर्णी) तिच्यापरीनं नाट्य पेरतच असते. काहीही झालं तरी, कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी रमेश (पद्मनाभ बिंड) अवलीच्या पाठीशी उभा राहतो. शेवटी अवली तिचं ध्येय गाठते, की गावकऱ्यांच्या विरोधाला कंटाळून गाव सोडते? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी सीरिज पाहायलाच हवी.
Maharashtra TimesSalman Khan Property Deal: एका वर्षात दुसरी प्रॉपर्टी डील, सलमान खानने विकला वांद्र्यातला अलिशान फ्लॅट, इतक्या कोटींना झाला व्यवहार

गावातील अस्सलपणा चित्रीकरणातून दाखवण्याच्या कौशल्यासाठी दिग्दर्शक संतोष कोल्हे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. देविका दफ्तरदार हिनं सून, बायको, आई आणि सरपंच असे एकाच भूमिकेचे वेगवेगळे पदर अप्रतिमरीत्या उलगडून दाखवले आहेत. सीरिज संपली, तरी खूप वेळ अवली मनात घोळत राहते. पूर्वी सरपंच असलेला नवरा आणि आता सरपंचाचा नवरा या दोन्हीतील फरक किशोर कदम यांच्याशिवाय कुणी दाखवूच शकलं नसतं, हा विश्वास ते अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात निर्माण करतात. कट्टर विरोधकाची भूमिका मिलिंद शिंदे यांनी समरसून साकारली आहे. अश्विनी कुलकर्णी साकारत असलेल्या ऐश्वर्या या पात्राशिवाय कथेला पूर्णत्व प्राप्त झालं नसतं. तिच्या अभिनयात वेगळीच जादू आहे, हे नक्की. अवलीच्या पाठीशी सावलीसारखा असणाऱ्या रमेशचं पात्र साकारणारा पद्मनाभ बिंड भाव खाऊन जातो. इथे विशेष कौतुक लेखक श्याम पेठकर यांचं करावंसं वाटतं, त्यांच्या अनुभवी लेखणीतून प्रत्येक पात्र जिवंत झालं आहे. अशी पात्र असू शकतात असं म्हणण्यापेक्षा अशी पात्र आहेत, हा विश्वास त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेतून निर्माण केला आहे. आणखी अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे प्रत्येक व्यक्तिरेखेच्या भाषेवर आणि लहेजावर मेहनत घेण्यात आलेली आहे.
Maharashtra TimesDevoleena Bhattacharjee: मंत्रोच्चार करा, आरक्षणाची गरजच पडणार नाही, स्वतः ज्ञानी व्हाल ,दुसऱ्यांनाही त्रास होणार नाही; अभिनेत्रीची ‘X’ पोस्ट, नेटकऱ्यांची सडकून टीका
आजही महिलांना अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो, हे आपण ऐकत आलो आहोत. पण ते कसं हे अवलीच्या उदाहरणावरून दिसून येतं. ही सीरिज नुसतीच मनोरंजक नाही तर गाव आणि गावकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती देणारी कलाकृती आहे. शहरी भागात राहिलेल्या-वाढलेल्या मंडळींना ग्रामपंचायतीच्या राजकारणाविषयी जाणून घ्यायचं असेल, तर ही सीरिज नक्की पाहण्यासारखी आहे. यात कसला ड्रामा नाही की, उगाच वाकडीतिकडी वळणं नाहीत, पण पुरेपूर ‘राजकारण’ आहे, त्यातच गंमत आहे. या सीरिजचा तिसरा सीझन नक्की यावा, अशी इच्छा ही सीरिज पाहणारा प्रत्येक प्रेक्षक व्यक्त करेल हे नक्की!

वेब सीरिज : सौभाग्यवती सरपंच
ओटीटी : अल्ट्रा झक्कास मराठी
कलाकार : देविका दफ्तरदार, किशोर कदम, मिलिंद शिंदे, अश्विनी कुलकर्णी, आशा ज्ञाते, पद्मनाभ बिंड.
दिग्दर्शक : संतोष कोल्हे
लेखक : श्याम पेठकर
दर्जा: साडेतीन स्टार



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत