Maharashtra Monsoon: २६ जुलै रोजी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या किनाऱ्यावरील काही भागांत मुसळधार पाऊस होणार असला तरी या प्रणालीचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. जुलैच्या अखेरीस पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या पट्ट्याचा काय परिणाम?
उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे २५ ते २८ जुलैदरम्यान देशातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. २६ जुलै रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यातील नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पण जुलै ३० पर्यंत पुन्हा पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंतही मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता कमी आहे. पुढील पंधरवड्यात पावसाच्या सरी बरसतील पण कोणत्याही सक्रीय प्रणालीशिवाय मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस होईल पण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जुलैअखेरीस सरासरीहून कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २३ ते२९ जुलैदरम्यान दक्षिण आणि मध्य भारत तसेच पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परंतु, राज्यातील उर्वरित भागात सरासरीहून कमी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ३० जुलै तर ५ ऑगस्टदरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या बहुतांश भागात आणि पूर्व व मध्य भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. परंतु, भारतात उर्वरित भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
हवामानतज्ज्ञांचा अंदाज काय?
आयएमडी-पुणे येथील शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले की, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आणि मान्सूनच्या व्यापक सक्रियतेचे कोणतेही संकेत नाहीत. “दुसऱ्या आठवड्याच्या विसंगती नकाशांमध्ये महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर पांढरे ठिपके दिसत आहेत. त्यात नारंगी किंवा लाल रंगाच्या छटा नाहीत, जे दर्शवते की पाऊस सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे,” असे सानप म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, ऑगस्ट महिन्याचा अंतिम अंदाज या महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल.
ते म्हणाले की, शनिवारी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे नवीन क्षेत्र तयार झाले असले तरी, त्याचा महाराष्ट्रावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता नाही. “या प्रणालीमुळे प्रामुख्याने पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही किनारपट्टीच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे घाटांसाठी रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात केवळ हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाटांमधील काही ठिकाणी अतिवृष्टी ते प्रचंड मुसळधार पाऊस पडू शकतो,” असे ते म्हणाले.
उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात कसा पाऊस असेल?
नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये हलका पाऊस राहील. दरम्यान, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी, बीड हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. वादळी वारे ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणार आहे.
विदर्भात पावसाचा अंदाज
रविवारी अकोला,अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटास वादळी पाऊस होणार आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

