उंच, अधिक उंच. वेग, अधिक वेग, अशी आस माणसाला आहे. आपण अधिकाधिक मोठं व्हावं, साऱ्यांनी आपलं कौतुक करावं, आपली वाहवा करावी, आपल्या भोवती आरत्या ओवाळाव्यात, आपली तारीफ करावी असं सगळ्यांनाच वाटत असतं. हे मोठेपण मिळवायचं, तर त्यासाठी कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, चिकाटीनं आणि न दमता सतत काम करावं लागतं, कल्पनाशक्ती सतेज ठेवावी लागते आणि हे सारं साधायचं तर मनाची एकाग्रता असावी लागते, पण उंच जाण्याच्या वेडाबरोबरच आपल्याला सगळंच काही पटकन व्हावं असंही वाटत असतं. याचं कारण आपल्याला वेगाचंही पिसं लागलेलं आहे,आाणि ते वाढतच चाललेलं आहे की काय असं वाटावं, अशी परिस्थिती आहे.
बहिणाबाई चौधरी म्हणतात, ‘मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात।।’ ते या क्षणी इथं आहे, तर दुसऱ्या क्षणी कुठं जाईल याचा नेम नाही. याचं कारण माणसाचं मन मोकाट, ओढाळ, चपळ, लहरी आहे आणि जहरीही आहे. या मनाला आवर घालणं म्हणजे वाऱ्याची मोट बांधण्यासारखं आहे. आणि त्या आदिशक्तीला ज्या सगुण रूपात आपण बघत असतो, त्याची भक्ती करायची तर मनाची एकाग्रता साधावी लागते. चित्त आवरावं लागतं. मोह दूर सारावे लागतात. तरच ईश्वराची भक्ती करणं शक्य होतं.
थोडक्यात, देवाची भक्ती करणं ही सोपी गोष्ट नाही. गंध-माळा-टिळे, आरत्या हे बााह्योपचार झाले. पूजा करणं हा देखावा झाला. पण मनाला त्या सगुणाशिवाय साऱ्या जगाचा विसर पडत नाही, सारं चित्त त्या मूर्तीवर केंद्रित होत नाही, अवघी नजर त्या चरणांवर खिळत नाही, तोवर सारं व्यर्थ आहे. तुकाराम महाराज सांगतात,
‘भक्ति तो कठिण शुळावरील पोळी।
निवडे तो बळी विरळा शूर।।
जेथें पाहें तेथों देखीचा पर्वत।
पायाविण भिंत तांतडीची।।
कामाविले तरि पाका ओज घडे।
रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे।।
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश।
नित्य नवा दिस जागृतीचा।।’

