आजार मुळातून बरा करायचा आहे, की केवळ वेदनाशामक औषधे वापरून दुःख नाकारायचे आहे, हे निश्चितपणे ठरवावे लागेल.

मला ध्यान करणे जमत नाही,’ तो शिष्य मोठ्या काकुळतीने गुरूंना सांगत होता. ‘मनातले विचार काही केल्या कमी होत नाहीत. तुम्ही प्रत्यक्ष ध्यानाच्या वेळी मला काही सूचना द्याल का? मी खूप अपेक्षेने आलो आहे.’ त्याच्या या विनवणीवर गुरूंनी स्मितहास्य केले. ते म्हणाले, ‘ध्यान न जमणे यात काही लाजीरवाणे वाटण्यासारखे नाही; पण स्वतःवरचा विश्वास ढळू न देणे आवश्यक आहे.
तू ध्यान कशासाठी करतोस?’ शिष्य म्हणाला, ‘आपल्या उपदेशानुसार, स्वतःचे मूळ स्वरूप समजून घेण्यासाठी ध्यान करायचे असते. माझीही तीच इच्छा आहे.’ गुरू हसून उत्तरले, ‘समजा, चांदीचा एक दिवा खूप काळ उघड्यावर ठेवल्यामुळे त्यावर डाग पडले, तो काळपट पडला, तर त्यावर खरा उपाय कोणता? त्या दिव्याला चंदेरी रंगाचा लेप देणे, की काळेपणा घासून मूळ उजळपणा मिळवणे? ध्यानामध्ये दुसऱ्याच्या सूचनांकडे लक्ष देणे म्हणजे दिव्याच्या मूळ उज्ज्वलतेवर विश्वास न दाखवता कृत्रिम रंग चढवण्यासारखे आहे.’
आपले कल्याण व्हावे, ही भावना लोकांमध्ये असते. कल्याण म्हणजे नेमके काय, हे नीटसे न उमगलेले लोक ध्यानासारख्या सूक्ष्म उपासनांचा मार्ग अवलंबतात आणि एरवी सात्त्विक भासणारे मन मुळात किती उद्योग करते, अनावर होते, याची चुणूक दिसताच हतोत्साहित होतात. त्यातूनच ध्यानाचे हे न जमणारे तंत्र न हाताळता ‘मार्गदर्शित ध्यान’चा आधार त्यांना सोयीस्कर आणि तत्काळ सुख देणारा वाटू शकतो.
स्वतःला उन्नत करण्यासाठी सतत बाहेरून सूचना घेण्याची जडलेली सवय ध्यानातही वापरावीशी वाटू शकते. स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर साधकाने अविश्वास दाखवू नये. ज्याला ध्यानात खरी सखोलता साधायची आहे, त्याने ध्यानात दुसऱ्याच्या शब्दांतून स्वतःवर कृत्रिम शांती आरोपित करणे म्हणजे लॉटरीचे तिकीट विकत घेऊन श्रीमंत झाल्याचा समज करून घेण्यासारखे आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या स्वरूपाचा शोध कितीही कठीण वाटला, तरी एकट्यानेच घ्यायचा असतो. त्यासाठी बुद्धी एकाग्र करण्याची मेहनत घ्यावीच लागते. ‘स्वयंप्रज्ञता’ अर्थात स्वतःला जाणण्यासाठी योग्य बनणे, हा ज्ञानासाठी एकमेव मार्ग आहे.

