Headlines

वसई-विरारमधून जाणार बुलेट ट्रेन, विरार स्थानकाचा कायापालट; कसा होणार विकास?| Maharashtra Times


Mumbai-Ahmedabad High Speed Railway: मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे म्हणजेच बुलेट ट्रेन ही महाराष्ट्रातील वसई-विरार शहरातून जाणार आहे. यावेळी दोन्ही स्थानकांचा विकास होणार आहे.

mumbai-ahmedabad bullet train update
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वैष्णवी राऊत, वसई: मुंबई-अहमदाबाददरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये विरार येथे एक स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाचा आणि परिसराचा विकास विविध टप्प्यांत करण्यात येणार असून, तो शाश्वत पद्धतीने केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी ‘व्हेलो सिटी’ संकल्पना राबवण्यात येणार असून, पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन म्हणून सायकलला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे म्हणजेच बुलेट ट्रेन वसई तालुक्यातूनही जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यात एकूण चार स्थानके प्रस्तावित असून त्यात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर यांचा समावेश आहे. यानुसार वसई-विरार परिसरात उभारण्यात येणारे विरार स्थानक नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील वालईपाडा येथे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

Maharashtra TimesMumbai-Navi Mumbai Airport Metro: ‘मेट्रो लाइन 8’ला सरकारची मंजुरी, एकूण 20 स्थानकं; दोन्ही विमानतळ जोडणारी मार्गिका कधी सुरू होणार?

कसा होणार विकास?

विरार स्थानकासह परिसराचा विकास सुमारे ४६५ हेक्टर क्षेत्रात करण्यात येणार आहे. या परिसरात नागरी वसाहती, तसेच व्यावसायिक केंद्रांचा विकास होणार असून हे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थानक उभारणी, दुसऱ्या टप्प्यात स्थानिक क्षेत्राचा विकास, तर तिसऱ्या टप्प्यात मध्यम ते कमी घनतेचा दीर्घकालीन विकास स्थानक सुरू झाल्यानंतर पाच वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.

या प्रकल्पा अंतर्गत विरार स्थानक परिसराचा विकास ‘व्हेलो सिटी’ या संकल्पनेनुसार करण्यात येणार आहे. या संकल्पनेनुसार, विरार स्थानक केवळ प्रादेशिक वाहतूक केंद्र न राहता शाश्वत, सायकल-स्नेही आणि पर्यावरणपूरक शहरी केंद्राचा मुख्य भाग म्हणून विकसित होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra TimesKarjat-Panvel Railway: कर्जत-पनवेल थेट लोकलने प्रवास, डोंगरातून बोगदा तयार; 29 किमी लांब मार्गिकेने 30 मिनिटांत होणार अंतर पार

विकासातील अडथळे

विरार स्थानिक नियोजन क्षेत्राचा विस्तार सुमारे ४६५ हेक्टर आहे. वसई-विरार महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भागातील बहुतांश क्षेत्र ग्रीन झोनमध्ये आहे. सुमारे ३० टक्के भाग वनक्षेत्रात येतो. काही ठिकाणी बेकायदा बांधकामांची समस्या असून, बहुतांश जमीन खासगी मालकीची आहे. या अडचणींबाबत प्रकल्प संचालक व संयुक्त समन्वय समितीला कळवण्यात आले आहे.

महापौरांनी घेतला आढावा

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात जायका संस्थेचे प्रमुख व सदस्यांनी सोमवारी वसई-विरार महापालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापौर अजीव पाटील यांनी प्रकल्पासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यानंतर दृकश्राव्य माध्यमातून प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर मार्शल लोपीस, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, माजी आमदार क्षितीज ठाकूर, सभागृह नेते प्रफुल साने, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत, परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव, उपसंचालक नगररचना मनिष भिष्णूरकर, नगररचनाकार श्वेता माने, जायका संस्थेचे प्रमुख सेईचिरो अकीमुरा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा