मुंबई : रोहित शर्मा २०२७च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. अशातच भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहितसारख्या अनुभवी खेळाडूला प्रत्येक मालिकेनंतर तपासण्यापेक्षा त्याला थेट २०२७च्या वर्ल्डकपसाठी तयार ठेवावं, असं रहाणेने म्हटलं आहे. इतकंच नाही, तर बीसीसीआय आणि निवड समितीने रोहितला स्पष्टपणे सांगावं की, तो वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रहाणेने रोहितच्या अनुभवाचं महत्त्व सांगितलं. २०२७चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. तिथल्या आव्हानात्मक परिस्थितीत फलंदाजी करण्याचा रोहितकडे मोठा अनुभव आहे. त्यामुळे अशा मोठ्या स्पर्धेत त्याचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येऊ शकतो, असं रहाणेचं मत आहे.
रहाणेच्या मते, रोहितने वर्ल्डकप खेळायचा निर्णय घेतला असेल, तर त्याच्या निवडीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. “रोहित शर्माला तो २०२७च्या वर्ल्डकपमध्ये खेळणार असल्याचं सांगणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षांतील त्याचं योगदान पाहता त्याच्या अनुभवाची भारताला गरज आहे. त्याच्या निवृत्तीबाबत चर्चाच व्हायला नको. एकदा तुम्ही त्याला सांगितलं की, ‘रोहित, तू खेळणार आहेस’, की विषय संपला. तो इतका मोठा खेळाडू आहे की प्रत्येक मालिकेच्या आधारावर त्याचं मूल्यांकन करता कामा नये,” असं रहाणेने सांगितलं.
क्रिकेटमध्ये खेळाडूची लय आणि मानसिकता यांना मोठं महत्त्व असतं. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने विश्वास देणं आवश्यक असल्याचं रहाणेने स्पष्ट केलं. “वरिष्ठ खेळाडूंना आदर मिळायला हवा. क्रिकेट हा लयीचा खेळ आहे. चांगली लय मिळवण्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. त्यामुळे रोहितला योग्य मानसिकतेत राहण्यासाठी तसं वातावरण मिळालं पाहिजे. २०२७च्या वर्ल्डकपमध्ये त्याचा अनुभव भारतासाठी निर्णायक ठरू शकतो,” असं रहाणे म्हणाला.
रहाणेने पुढे रोहितच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नसल्याचंही सांगितलं. संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि वरिष्ठ खेळाडू यांच्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. रोहितला २०२७चा वर्ल्डकप खेळायचा असेल, तर त्याला खेळू द्यावं, अशी स्पष्ट भूमिका रहाणेने मांडली.
दरम्यान, रोहितने २०२६मध्ये आतापर्यंत ८ वनडे सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एका शतकासह ३०० धावा आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी ३७.५० असून स्ट्राइक रेट ९२.५ आहे. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या वनडेत रोहितने १३८ धावांची शानदार खेळी केली होती. या खेळीनंतर त्याने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली.
आता २७ सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी रोहितला संघात स्थान मिळतं का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. रोहितने आतापर्यंत २८८ वनडे सामन्यांत ३४ शतकं आणि ६२ अर्धशतकांच्या मदतीने ११,८९५ धावा केल्या आहेत. त्यामुळे २०२७च्या वर्ल्डकपच्या दृष्टीने त्याचा अनुभव भारतासाठी किती महत्त्वाचा ठरतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा