Headlines

रायगडकरांना ‘टोलमाफी’ नाहीच! खारपाडा नाक्यावर स्थानिकांकडूनही टोलवसुली; मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास महागला| Maharashtra Times


Mumbai-Goa National Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून आता खारपाडा टोलनाक्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. यानंतर नागोठाणे येथेही एक टोलनाका सुरू करण्यात येणार आहे.

खारपाडा टोल नाका
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, अलिबाग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा टोलनाका सुरू झाल्यानंतर, रायगड जिल्ह्यातील एमएच-०६ आणि एमएच-४६ पासिंगच्या वाहनांना टोलमाफी दिल्याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात टोलनाक्यावर या वाहनांकडून सर्रास टोल वसूल केला जात आहे. त्यामुळे रायगडकरांची दिशाभूल झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही मौन बाळगल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

टोलविरुद्ध आक्रमक भूमिका

खारपाडा टोलनाका शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात आला. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी या टोलविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आंदोलनानंतर रायगड जिल्ह्यातील एमएच-०६ नोंदणीकृत वाहनांना टोलमाफी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे स्थानिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पायुषी ठरला.

Maharashtra TimesMumbai-Goa Highway: कोकणवासियांचा प्रवास महागणार; मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच टोलनाके उभे, 4 वेळा टोलवसुली

प्रत्यक्षात टोलनाक्याच्या व्यवस्थापनाने स्पष्टीकरण देत, ही सवलत रायगडमधील सर्व वाहनांना नसून केवळ पेण आणि पनवेल शहर परिसरापुरती मर्यादित असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ‘रायगडकरांना टोलमाफी’ ही घोषणा केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच होती का, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.

अनेक कामं रखडली

गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या टप्प्याचे काम तब्बल १६ वर्षांपासून रखडलेले आहे. अनेक ठिकाणी सेवा रस्ते अपूर्ण आहेत. ड्रेनेज व्यवस्था नाही, उड्डाणपुलांची कामेदेखील रखडली आहेत. रामवाडी येथील वाशी नाका परिसरात वडखळकडे जाणारा मार्ग बंद असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. इंदापूर आणि माणगाव येथील वाहतूककोंडीमुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

महामार्गाच्या कामात इतक्या गंभीर त्रुटी असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलवसुली सुरू केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, महामार्गावरील फलकदेखील हिंदी भाषेत असल्याने स्थानिकांच्या भावनांचा अपमान होत असल्याची टीका होत आहे.

Maharashtra Timesमाणगाव-इंदापूर बायपास जूनपर्यंत खुला करण्याचं आश्वासन, प्रत्यक्षात संथ गतीने काम सुरू; Mumbai-Goa Highwayला विलंब होणार?

लोकप्रतिनिधींचे मौन

रायगडकरांची उघड लूट सुरू असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून असल्याचे चित्र आहे. निवडणुकांच्या वेळी जनतेसमोर मोठमोठ्या घोषणा करणारे नेते आता टोलच्या प्रश्नावर गायब झाल्याची भावना आहे. रायगडसह संपूर्ण कोकणातील नागरिकांची होणारी आर्थिक लूट तातडीने थांबवून खारपाडा टोल बंद करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा