![]()
अयोध्येतील श्रीराम मंदिरातून झालेली कथित चोरी अभूतपूर्व आहे. या घटनेने भाजप आणि संघाचे कार्यकर्ते व समर्थकही हादरले आहेत. हे केवळ एखाद्या सामान्य मंदिरातील चोरीचे प्रकरण नाही. पूजास्थळी चोऱ्या होणे ही गोष्ट नवीन नाही आणि अनेकदा लोक ती सहनही करतात. पण राम मंदिर वेगळे आहे. येथील अर्पणाची रक्कम खूप मोठी होती. दिल्लीजवळ राहणाऱ्या त्या शेतकऱ्याप्रमाणेच लाखो लोक असतील. तो खिन्न स्वरात म्हणालास, मंदिर उघडल्यानंतर मी दर्शनासाठी गेलो होतो, तेव्हा मी माझे सोन्याचे कडे अर्पण केले होते. त्याची त्या वेळी किंमत किमान अडीच लाख रुपये होती.’ त्या अर्पणामागे एक भावना होती. ही फसवणुकीची भावना केवळ आर्थिक नुकसानापुरती मर्यादित नाही. त्याकडे श्रद्धेचा विश्वासघात म्हणून पाहिले जाते, तेव्हा ती अधिक अस्वस्थ करते. आणि जेव्हा हे अर्पण अशा प्रभू रामचंद्रांच्या नावावर केलेले असते. लोकांची अफाट श्रद्धा आहे, तेव्हा ही भावना अधिक तीव्र होते. 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते दिल्ली अशी प्रसिद्ध रथयात्रा सुरू केली होती आणि बिहारमध्ये त्यांना अटक झाली होती, तेव्हा श्रीराम मंदिर निर्माणाच्या विचाराने उत्तर आणि पश्चिम भारतात कशा प्रकारच्या भावना जागृत केल्या होत्या, हे आपण विसरू शकत नाही. संघ, भाजपच्या अनेक लोकांनी याला देशातील ‘आध्यात्मिक पुनर्जागरणाची’ सुरुवात म्हटले होते. लाखो हिंदूंसाठी राम मंदिराचे निर्माण म्हणजे त्यांच्या अस्मितेच्या पुनर्स्थापनेसाठी चाललेल्या ‘५00 वर्षांच्या संघर्षाची’ परिणती होती. अशा स्थितीत जेव्हा हे समजते की, यामागे ‘नोट आणि वोट’चा संघर्ष होता, तेव्हा जीवनातील भ्रमनिरासाची अशी वेदनादायक जाणीव क्वचितच दुसरी असू शकेल. संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी (खाजगी चर्चेत) या प्रकरणाला 19५1 मध्ये भारतीय जनसंघाच्या स्थापनेनंतरची सर्वात मोठी घटना म्हटले आहे. संघाच्या विचारसरणीशी तुम्ही सहमत असा किंवा नसा, पण दुष्काळ, पूर, त्सुनामी किंवा कोणत्याही राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी त्यांच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यामुळे समाजाच्या अनेक वर्गांत त्यांना आदर मिळत आला आहे. जयपूरमधील एका गावातील एका पॅथॉलॉजिस्टने, ते संघ आणि भाजपचे समर्थक आहेत, मला म्हटले, “भाजप एक राजकीय संघटना आहे, त्यामुळे तिथे अशी घटना घडली तर ती काही प्रमाणात समजू शकते, पण संघात…!” इतके बोलून त्यांनी वाक्य अपुर्ण सोडले, पण त्यांची अस्वस्थता आणि निराशा स्पष्ट होती. या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे बहुतांश सदस्य एकतर संघाचे प्रचारक होते किंवा त्याशी संबंधित होते, हे तथ्य स्वाभाविकपणे या संघटनेची अस्वस्थता अधिक वाढवते. असा गौप्यस्फोट अशा वेळी होणे संघासाठी सोयीचे नाही, जेव्हा ते आपल्या अस्तित्वाच्या 100 वर्षांचा उत्सव साजरा करत आहेत आणि त्यांनी ‘नव्या माणसाच्या निर्मितीचे’ ध्येय ठेवले आहे. अलीकडच्या महिन्यांत संघाचे नेतृत्व अशा सामाजिक वर्गांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. वास्तविक त्यांच्याशी पूर्वी त्यांचा संपर्क नव्हता. अशा स्थितीत जनक्षोभ पाहून संघ आणि भाजप आता ‘डॅमेज-कंट्रोल’च्या स्थितीत आहेत, यात नवल नाही. सुरुवातीच्या संकोचानंतर संघ नेतृत्वाने या घटनेचा निषेध केला आहे. पैशाच्या कथित गैरवापराबाबत चिंता व्यक्त करत संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी या घटनेचा धिक्कार केला आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ट्रस्टच्या अलीकडील बैठकीत, जबाबदारी निश्चित करण्यासाठी एका व्यावसायिक सीईओची नियुक्ती करण्यासह आवश्यक प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रस्टच्या बैठकीत सरचिटणीस चंपत राय (ते संघ प्रचारक आहेत आणि अनेक वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेशी जोडलेले आहेत) विश्वस्त अनिल मिश्रा आणि आमंत्रित सदस्य गोपाल राव यांचे राजीनामे स्वीकारले गेले. हे राजीनामे एसआयटीच्या अंतरिम अहवालानंतर आणि चंपत राय यांच्या माजी ड्रायव्हरसह आठ जणांच्या अटकेनंतर घेतले गेले. मात्र, एसआयटीच्या अंतरिम अहवालात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चंपत राय यांचे नाव नाही. चंपत यांनी म्हटले आहे की, अंतिम अहवाल आल्यानंतरच ते आपली बाजू मांडतील. या संपूर्ण घटनाक्रमाचा संघाच्या प्रतिमेला धक्का लागला आहे, हे स्पष्ट आहे. यामुळे ‘हिंदुत्व प्रकल्पा’बद्दलही लोकांचा भ्रमनिरास होऊ शकतो, अशी भीती त्यांना वाटते. अयोध्येच्या मुद्द्यावर नाराज असलेले मतदार आपोआप विरोधी पक्षांकडे वळतील, असे मानणे योग्य ठरणार नाही, जरी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्लाबोल करण्यास अजिबात उशीर केला नाही. परंतु, अयोध्या कधीच विरोधी पक्षांचा मुद्दा राहिला नसल्याने, भाजपचे अनेक समर्थक निवडणुकीच्या वेळी घरी बसण्याचा निर्णयही घेऊ शकतात. पण याचा फायदाही शेवटी विरोधी पक्षांनाच होईल.हा मुद्दा उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावरील राजकीय चर्चा बदलू शकेल का? आतापर्यंत विरोधकांना हेच उमजलेले नाही की, राम मंदिराच्या भोवती निर्माण झालेल्या भाजपच्या ‘हिंदू राष्ट्रवादाच्या’ मुद्द्याचा सामना कसा करायचा. राम मंदिर हा भाजपचा असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बनला, ज्याने त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवले. यातून झालेल्या हिंदू एकीकरणाने पक्षाला भारताच्या मोठ्या भागात विस्तार करण्यास मदत केली. संघ आणि भाजप याला ‘हजार वर्षांचा सभ्यताविषयक प्रकल्प’ म्हणून मांडत आले आहेत.आता बरेच काही योगी आदित्यनाथ काय निर्णय घेतात, यावर अवलंबून असेल. तरी तांत्रिकदृष्ट्या ते ट्रस्टच्या व्यवस्थापनाशी जोडलेले नाहीत तरीही ते उत्तर प्रदेशातील भाजप सरकारचे प्रमुख आहेत. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर योगी पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये समाविष्ट होऊ शकतात. परंतु भाजप उत्तर प्रदेशात हरली किंवा केवळ अल्प मताधिक्याने सत्तेत परतली, तर त्यांचा दावा कमकुवत होऊ शकतो. तरीही, संघातील अनेक लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांचा प्रभाव केवळ उत्तर प्रदेशापर्यंत मर्यादित नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ठकवल्याची भावना केवळ आर्थिक नुकसानापुरती मर्यादित नाही. त्याकडे श्रद्धेचा विश्वासघात म्हणून पाहिले जाते, तेव्हा ती अस्वस्थ करते. प्रभू रामचंद्रांवरील अपार श्रद्धेतून केलेले दान असल्याने ही भावना अधिक गहिरी होते.
Source link
नीरजा चौधरी यांचा कॉलम:मंदिरातील ‘चोरी’मुळे समीकरणे बदलतील?
