Headlines

तलाव, टेकड्या, उद्यानाखालून जुळे बोगदे, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी ‘टीबीएम’ तयार; महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होणार| Maharashtra Times


GMLR Twin Tunnels: मुंबईतील महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या सर्वात कठीण बांधकामाच्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. महापालिका या आठवड्याच्या शेवटी बोगदा खोदकाम सुरू करण्याच्या तयारीत आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड
मुंबई: महापालिकेने मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम हाती घेतलं आहे. या प्रकल्पातील कामाचा सर्वात महत्त्वपूर्ण टप्प्याचं काम सुरू होणार आहे. मुंबईतील रस्त्यांखाली जुळे बोगदे बांधण्यात येणार आहेत. या बोगद्यांचं खोदकाम या प्रकल्पातील सर्वात कठीण टप्पा आहे. खोदकामासाठी लागणारं टनेल बोरिंग मशीन तयार असून आता येत्या काही दिवसांत खोदकामालाही सुरूवात होणार आहे.

मशीन तयार

गोरेगाव येथे दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात लाँच शाफ्टमध्ये ही मशीन सज्ज आहे. सर्व सुरक्षा तपासण्या आणि चाचण्याही पूर्ण करण्यात आल्या आहेत. काही तांत्रिक चाचण्या शिल्लक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अधिकृत परवानगीसाठी पत्रही पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर या आठवड्याच्या शेवटी खोदकाम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना पुढील कामांचे निर्देश दिले.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी दोन जुळ्या भुयारी बोगद्यांचं काम सुरू केलं आहे. गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून सुरू होऊन मुलुंडमधील खिंडीपाड्यापर्यंत हे भुयारी बोगदे असतील. प्रत्येक बोगदा ४.७ किमी लांब असेल. १४.२ मीटर व्यासाचे बोगदा असतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली हे बोगदे १३ मीटर रुंद होतील. संपूर्ण प्रकल्पासाठी १४,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईत थेट पूर्व-पश्चिम लिंक तयार होणार आहे. पश्चिम उपनगरांना १२.२ किलोमीटर लांब मार्गाने थेट पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

जोडरस्त्यांसह हे बोगदे ६.६५ किमी लांब होतील. जंगल, टेकडयांच्या खालून आणि तुळशी आणि विहार तलावाच्या परिसरातून हे बोगदे बांधण्यात येणार आहेत. मुंबईतील जमीनीखाली असलेल्या बेसाल्ट खडक फोडण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. फिरत्या कटरहेडसह या मशीनने ही खडकं फोडून मार्ग तयार करण्यात येणार आहेत. ४.४५ किमी लांब मार्गाचं खोदकाम या मशीद्वारे होणार आहे. पहिल्या मशीनने गोरेगावपासून मुलुंडपर्यंत जाणाऱ्या मार्गाचं खोदकाम होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या मशीनची जोडणी अद्याप सुरू आहे. जुलै २०२५ मध्ये जपानमध्ये तयार केलेले हे दोन टीबीएम मुंबईत आणण्यात आले. त्याच्या एका वर्षानंतर हे खोदकाम सुरू झालं आहे.

Maharashtra TimesWeather Update: महामुंबईत जोरदार पाऊसधारा, पुण्यात ११७ वर्षांचा विक्रम मोडला; राज्यात १४ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

या दोन्ही मशीनला तुलशी आणि विहार असं नाव देण्याची योजना आहे. या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेत सादर केला आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी २०२८ ची डेडलाइन देण्यात आली होती. पण आता हा मार्ग फेब्रुवारी २०२९मध्ये तयार होईल अशी माहिती अभिजीत बांगर यांनी दिली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा