Headlines

डोंबिवलीकर वाहतूक कोंडीने हैराण; रिक्षांच्या रांगेत प्रवाशांची होते फरफट


Dombivli News: मानपाडा रोड आणि पुढे कल्याण -शिळा मार्गावर दिवसभर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीकर चांगलेच हैराण झाले आहेत.

डोंबिवलीकरांना कोंडीचे ग्रहण
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली:डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून जाणाऱ्या मानपाडा रोड आणि पुढे कल्याण-शिळ मार्गावर दिवसभर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची घुसमट होत आहे. त्यातच कोंडीचे कारण देत रिक्षाचालक गर्दीच्या वेळी सेवा देण्याचे टाळत असल्याने प्रवाशांना रांगेत ताटकळावे लागत आहे. प्रवाशांची दररोज होणारी ही फरपट थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रिक्षा स्थानकात आंदोलन

सागर्ली, शनी मंदिर, मानपाडा या भागात जाण्यासाठी तीन तास रांगेत थांबूनही स्टँडवर एकही रिक्षा न आल्याने प्रवाशांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रिक्षा स्थानकात आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत या मार्गावर बससेवाही सुरू करण्यात आली. वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरल्याने रिक्षाचालकांनी काही दिवस प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न केला.

प्रवाशांचे हाल सुरूच

मात्र, काही दिवसांतच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. गर्दीच्या वेळी धावणाऱ्या बसही वाहतूक कोंडीत अडकत असल्याने प्रवाशांना या सेवेचा फारसा फायदा होत नाही. मुंबईहून नोकरीवरून परतणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत वाहतूक सुविधाअपुऱ्या असल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे

सर्वाधिक प्रवासी वाहतुकीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दिवसभर नोकरी करून संध्याकाळी परतणाऱ्या प्रवाशांना लोकलचे धक्के सहन केल्यानंतर पुन्हा दोन ते तीन तास रिक्षाच्या रांगेत थांबावे लागते. प्रवाशांची प्रतीक्षेची रांग पूर्वेकडून रेल्वे पूल ओलांडून थेट पश्चिमेपर्यंत पोहोचते. यावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.राजकीय वादआणि चढाओढीत व्यस्त असणाऱ्या राजकीय नेत्यांना डोंबिवलीतील प्रवाशांचे हाल कधी दिसणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Maharashtra TimesNepal Flood : डॉ. चितळेंसह ग्रुप नेपाळ महापुरावेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावर, रिचा ट्रेक्सची माहिती, गंभीर फटका बसल्याची भीती

रिक्षाचालकांचे मत

दिवसभरात प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षा स्टेशन ते सोनारपाडा किंवा पलावा दरम्यान किमान आठ ते दहा फेऱ्या मारतात. मात्र, संध्याकाळी सहानंतर त्यांना एक किंवा दोन फेऱ्यांचीच संधी मिळते. त्यामुळे अनेक रिक्षाचालक दिवसभर व्यवसाय करून संध्याकाळी सहापूर्वीच निघून जात असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.

Maharashtra TimesNepal Flood : डॉ. चितळेंसह ग्रुप नेपाळ महापुरावेळी रसुवागढीच्या इमिग्रेशन केंद्रावर, रिचा ट्रेक्सची माहिती, गंभीर फटका बसल्याची भीती

डोंबिवली ते शनी मंदिरपर्यंतचा रस्ता रुंद करण्याची मागणी

आधीच या मार्गावर प्रवासी वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. त्यातच संध्याकाळी रिक्षांची संख्या कमी होते. पेंढरकर महाविद्यालय, सागाव, दत्तनगर, सुनीलनगर, नांदिवली या भागांकडे जाणाऱ्या मार्गांवर तुलनेने कमी कोंडी असल्याने रिक्षाचालकांकडून त्या मार्गांना अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे मानपाडा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नशिबी केवळ प्रतीक्षाच उरली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी डोंबिवली ते शनी मंदिरपर्यंतचा रस्ता रुंद करण्याची मागणी होत आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा