Headlines

कोकणात तीन आगारांसाठी १५ ‘जिजाऊ’ बस आल्या, रातोरोत रत्नागिरीला दिल्या; एसटी प्रवाशांमध्ये संतापाची लाट| Maharashtra Times


ST Bus: एसटी महामंडळाकडून काही महिन्यांपूर्वीच राजमाता जिजाऊ बससेवा सुरू करण्यात आली. आता कोकणासाठी दिलेल्या 15 नव्या बसगाड्यांवरून वाद निर्माण झाला आहे. तीन वेगवेगळ्या आगारांसाठी आलेल्या बसेस रत्नागिरीला देण्यात आल्या आहेत.

राजमाता जिजाऊ एसटी बस
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: कोकणातील दापोली हा महत्त्वाचा पर्यटन तालुका असतानाही, दापोली, मंडणगड आणि खेड एसटी आगारासाठी आलेल्या एकूण १५ जिजाऊ बसगाड्या अचानक रत्नागिरी येथे पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवासीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम यांच्याच मतदारसंघातील दापोली, खेड आणि मंडणगड या एसटी डेपोवर अवलंबून असलेल्या प्रवाशांवर हा अन्याय झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शुक्रवारी रात्री या बस वरील तिन्ही आगारांत दाखल झाल्या होत्या, मात्र शनिवारी सायंकाळी उशिरा तातडीने त्या पुन्हा रत्नागिरीला मागवून घेण्यात आल्या.

दापोली, मंडणगड आणि खेड आगारांना देण्यात आलेल्या बसेस इतर आगारांकडे वर्ग करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. या प्रकरणात एसटीचे अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन राजकारण करत आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी केला आहे. या अन्यायाविरोधात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एकीकडे परिवहनमंत्री ‘डिझेल वाचवा’ असा संदेश देत असताना, तिन्ही आगारांतून रिकाम्या बसगाड्या शनिवारी सायंकाळी रत्नागिरीकडे का रवाना करण्यात आल्या? तसेच, या गाड्यांवर स्थानिक आगारांचे ‘डेपो मार्किंग’ झाले असतानाही, ‘बस आगारात आल्याच नव्हत्या’ असा कांगावा एसटी अधिकारी का करत आहेत? हे नक्की कोणते राजकारण सुरू आहे?’ असा प्रश्न गुजर यांनी उपस्थित केला.

Maharashtra TimesST Bus: १०० टक्के एसटी बसेस ‘इलेक्ट्रिक’ करणार, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रवास आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार
आगारातून उंबरघर-ठाणे, सध्या दापोली पाजपंढरी-मुंबई, दाभोळ-बोरीवली, दाभोळ-नालासोपारा, भडवळे-नालासोपारा अशा मार्गांवर एसटीची प्रचंड मागणी आहे. सध्या ई-शिवाई बसगाड्या दापोलीतून ठाणे आणि बोरीवली मार्गावर सोडल्या जात आहेत. त्यामुळे नवीन बस आल्या असत्या, तर या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असता, मात्र राजकीय घडामोडींमुळे खोडा घातल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Maharashtra TimesST Bus : नेमून दिलेल्या हॉटेलांवर एसटी न थांबल्यास दंड, कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल होणार; परिवहन महामंडळाचा नवा नियम

पर्यटक, प्रवाशांची गैरसोय

‘या नवीन जिजाऊ बस मिळाल्या असत्या, तर मुंबई, पुणे, ठाणे, बोरिवली या मार्गांवर नवीन फेऱ्या सुरू करता आल्या असत्या. यामुळे पर्यटक आणि प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असती. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील या अंतर्गत राजकारणामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रवासी सचिन सावंत यांनी दिली.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा