आषाढी एकादशी हा भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामस्मरणाचा पवित्र दिवस मानला जातो.उपवास केला नाही तरी सात्त्विक आहार आणि भक्तिभावाने हा दिवस साजरा करता येतो.या निमित्ताने Sarita’s Kitchen यांनी शेअर केलेले पारंपरिक उपवासाचे पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक आहेत.

मात्र, आरोग्याच्या कारणांमुळे किंवा काही अडचणींमुळे प्रत्येकाला उपवास करणे शक्य होत नाही. अशावेळी उपवास न करता देखील भक्तिभावाने पूजा, नामस्मरण आणि सात्त्विक आहार घेऊन हा दिवस साजरा करता येतो. श्रद्धा आणि मनाची शुद्धता ही या व्रताची खरी भावना आहे. आषाढी एकादशीला उपवास केला नाही तरी घरात काही पारंपरिक उपवासाचे पदार्थ बनवून खाण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. अशाच काही स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांची माहिती Sarita’s Kitchen यांनी शेअर केली आहे. हे पदार्थ केवळ उपवासासाठीच नव्हे तर नेहमीच्या दिवसातही चवीने खाता येतात. (फोटो सौजन्य :- @Sarita’s Kitchen)
शेंगदाणा लाडू गोड आणि पौष्टिक पदार्थ
उपवासाच्या दिवसात गोड पदार्थ म्हणून शेंगदाणा लाडूला विशेष स्थान आहे. शेंगदाणे आणि गूळ यांचे मिश्रण शरीराला ऊर्जा देणारे तसेच चवीला अप्रतिम असते. शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी ५०० ग्रॅम शेंगदाणे भाजून त्याची साल काढावी आणि त्याची बारीक पूड करावी. त्यामध्ये ५०० ग्रॅम गूळ मिसळून लाडू वळावेत. शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि चांगले स्निग्ध पदार्थ असतात, तर गुळामुळे नैसर्गिक गोडवा आणि ऊर्जा मिळते.हे लाडू उपवासात मधल्या वेळच्या खाण्यासाठी उत्तम पर्याय ठरतात.
वरई भात आणि शेंगदाणा आमटी पारंपरिक उपवासाचे जेवण
उपवासाच्या दिवशी भगर किंवा वरईचा भात हा अनेक घरांमध्ये आवर्जून केला जातो. तांदळाऐवजी वापरली जाणारी वरई पचायला हलकी असून पौष्टिक असते.वरई भातासाठी एक कप वरई स्वच्छ धुवून घ्यावी. दोन कप गरम पाण्यात ती शिजवावी आणि चवीनुसार मीठ घालावे. साधा, हलका आणि चविष्ट असा हा भात तयार होतो.यासोबत शेंगदाण्याची आमटी केली तर जेवणाची चव आणखी वाढते. शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे, तूप किंवा शेंगदाणा तेल, उकडलेला बटाटा आणि मीठ यापासून ही आमटी तयार केली जाते.फोडणीसाठी तुपात किंवा तेलात जिरे टाकून त्यात हिरवी मिरची परतावी. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, पाणी आणि बटाटा घालून आमटी उकळावी. ही आमटी वरई भातासोबत अतिशय स्वादिष्ट लागते.
साबुदाणा वडा कसा करावा
आषाढी एकादशी म्हटले की साबुदाणा वडा आठवतोच. कुरकुरीत बाहेरचा थर आणि आतून मऊ, चविष्ट मिश्रण असलेला साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय उपवासाचा पदार्थ आहे.साबुदाणा वडा तयार करण्यासाठी प्रथम एक कप साबुदाणा भिजवून घ्यावा. त्यामध्ये उकडलेला बटाटा, भाजलेल्या दाण्याचा कूट, हिरवी मिरची, किसलेले आले, कोथिंबीर, मीठ आणि थोडी मिरची पावडर मिसळावी.
हे मिश्रण चांगले मळून त्याचे छोटे गोळे करून वडे तयार करावेत. नंतर तूप किंवा शेंगदाणा तेलात हे वडे सोनेरी होईपर्यंत तळावेत.साबुदाणा आणि शेंगदाण्यामुळे या पदार्थातून ऊर्जा मिळते. उपवासाच्या दिवशी शरीराला आवश्यक ताकद देण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त ठरतो.
उपवास कसा करावा? काय खाऊ नये ?
उपवासाची दह्याची चटणी जेवणाची चव वाढवणारी साथ
उपवासाच्या जेवणात दह्याची चटणी एक वेगळीच चव आणते. थंडावा देणारी आणि पटकन तयार होणारी ही चटणी सर्वांना आवडते.यासाठी एक कप ताजे दही घ्यावे. त्यात जाडसर कुटलेले भाजलेले शेंगदाणे, मिरची पावडर, कोथिंबीर आणि मीठ मिसळावे. वरून तुपात जिरे फोडणी करून घातल्यास चव अधिक खुलते.ही चटणी साबुदाणा वडा, वरई भात किंवा इतर उपवासाच्या पदार्थांसोबत खाता येते.

