खरा तो एकचि धर्म , जगाला प्रेम अर्पावे… या भूमीतून किती नितांत सुंदर वैश्विक जगण्याची रीत सानेगुरुजींनी वर्णिली. परंतु प्रत्यक्षात ‘न कळे विंचासी कुरवाळीले अंग, आपले ते रंग दावितसे’ हा तुकोबांचा अनुभव आजच्या जीवनव्यवहारात सार्वत्रिक आहे. मनाने समृद्ध असणारी माणसे अवतीभवती दिसेनात. अनेकांचा आता चांगुलपणावर विश्वास नाही. उलट चांगुलपणा अंगी असणाऱ्याबाबत लोक साशंक, परंतु लबाडांच्या संगतीत अधिक रमतात. लोकांस स्वःअनुभूतीपेक्षा कथित, चर्चित, ऐकीव गोष्टींवरून इतरांच्या मोजमापाची सवय जडली. ही अशी माणसे सामाजिक व्यवहाराच्या सत्तास्थानी येता व्यवस्था विकलांग होत जाते. त्यांच्या अवाजवी हस्तक्षेपाने समाजस्वास्थ्य धोक्यात येते. अशा काळात सुसंस्कृत, संवादी, तत्त्वनिष्ठ माणसांना मूल्य नसते.
काय काशी करिती गंगा,
भीतरिं चांगा नाहीं तो…
मूलतः आपणच तत्त्वनिष्ठ जगण्याची ‘तळटीप’ स्पष्ट व्यापून असलो की हा दूषित समाजव्यवहार तितकासा आपल्याला बाधित करू शकत नाही; मात्र समूहच बाधित अवस्थेत असेल तर परिस्थिती जरा अवघड होते. अशावेळेस उपाय एकच – समाजव्यवहारील सात्विक मनोव्यापारात वाढ करीत जाणे. लिहित्या बोलत्या माणसांनी आपला ‘स्वर’ प्रखर करून नवी दृष्टी देणे. कारण आताशा समृद्ध मनाची माणसं कमी भेटतात.
निर्मोही, निरपेक्ष होता येणे हीच आज कसोटी नाही काय? स्वःच्या पुढे जावून, ‘जो जे वाछिंल, तो ते लाहो प्राणिजात’ असे माउलींप्रमाणे जनकल्याण मागणे, मानवजातीच्या हितार्थ स्वतःचा देह चंदनासारखा झिजवून निर्विकार होत जाणे आम्हांस जमायला हवे. आसक्तीत न रमता, अहंकार न कुरवाळता आपले संचित, ज्ञान इतरांना देत-घेत समृद्ध करण्याची धडपड करीत जाणे, वृथा प्रसिद्धीची बाधा न होता, पदाच्या मोहात न पडता, ज्ञानाचा अहंकार टाकून माणूस होण्याच्या जवळ जाता येणे. निर्मोही, निरपेक्ष होणे ही गोष्ट सोपी नाही; ती सोपी होवून माणसे समृद्ध होत जावीत. सामाजिक पर्यावरणातील प्रेम, सहिष्णुता वाढीस लागावी अन् सात्विकतेने आमुच्या जगण्याची अवघी ‘तळटीप’ व्यापून घ्यावी, यासाठीचा हा अट्टहास!

