भगवंताला किमती वस्तू, सोने-दागिने, पैसा, दान-दक्षिणा असे काही अर्पण करण्याची आवश्यकता नसते आणि त्यास मुळीच अपेक्षाही नसते. आजकाल अनेक नामांकित देवस्थानांना महागडे अलंकार, मुकुट, वेगवेगळ्या वस्तू अर्पण करण्याची अहमहमिका लागलेली दिसते! श्रद्धा वाईट नाही, प्रदर्शन मात्र चुकीचे.
संत नामदेवांनी बालवयात विठ्ठलास साखर-दुधाचा नैवेद्य दिला. कधी संत ज्ञानोबा माउलींनी ‘अमृतानुभव’ अन् ‘ज्ञानेश्वरी’ रूपातील ग्रंथ निरूपणाचा महाप्रसाद दिला. तर कधी कर्मयोगी संत सावतामाळी यांनी कांदा-मुळा, भाजी अथवा आपल्या शेतातला अन्य वानवळा (पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांकडे सोपवून) – तर कधी घरीच भावभक्तीने अर्पण केला! संत चोखामेळा यांनी निष्ठेने अर्पिलेला कांदा-भाकरीचा नैवेद्य भगवंताने गोडीने घेतला.
संत एकनाथांचा भारूड रूपातला, तर कधी नंतरचा नाथषष्ठीचा महाप्रसाद स्वीकारला. रामायणातील शबरीची बोरे अन् महाभारतातील मित्र सुदाम्याचे पोहे – तांदळाच्या कण्या आवडीने प्रसंगी भगवंत स्वीकारतो… असे कितीएक दाखले सांगावेत महाराज! ईश्वर भावभरल्या प्रेमाचा, स्नेहाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा भुकेला असतो. पान, फूल, फळ अथवा तुमच्याकडील यथाशक्ती, यथाशक्यतेनुसार जे काही असेल ते फक्त आदराने, आस्थेने अन् काळजातल्या ओलाव्याने भगवंत स्वीकारतो. या संदर्भात संत नामदेव महाराज काय सांगतात पाहा –
एक पसा पाणी एक बिल्वदळ।
पूजन केवळ सोपे बहु।
भक्त पुंडलिकाने आपल्या माता-पित्यांची सेवा करताना कमालीच्या आदराने आतिथ्य करताना देऊ केलेल्या विटेवर उभे राहणे पसंत केलेला विठो युगे लोटली तरीही वीट सोडून खाली उतरायचे नाव घेत नाही. शतकानुशतके असंख्य वारकरी – भाविक या दर्शनासाठी दर वर्षी पंढरीकडे प्रस्थान ठेवतात! अवघ्या विश्वात अशी भावभोळ्या भक्तीची, मायेच्या ओलाव्याने ओथंबून गेलेली वीट अन्यत्र नाही पहायला मिळणार अन् नाही कुणाला तयार करता येणार.

