वृत्तसंस्था, नवी दिल्ली
संयुक्त अरब अमिरातमध्ये 28 ऑगस्टपासून एसीसी महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत असून हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे लक्ष जेतेपदावर राहील. या स्पर्धेत 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक संघातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर स्पर्धेत भारताचा अ गटामध्ये समावेश आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारतीय संघ हा इतर संघाच्या तुलनेत सर्वात यशस्वी म्हणून ओळखला जातो. सदर स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना 30 ऑगस्ट रोजी थायलंडबरोबर होणार आहे. दोन गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तर 13 सप्टेंबर रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळविला जाईल.
भारत-पाक सामन्याकडे नेहमीच संपूर्ण जगात क्रिकेट शौकिन आकर्षिले जात असतात. पण या सामन्याचे भारतीय संघावर कोणतेच दडपण नसल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केले. भारतीय संघाने या स्पर्धेसाठी काही दिवसांपासूनच सरावावर अधिक भर दिला आहे. सदर स्पर्धेकरिता निवडण्यात आलेला भारतीय महिला संघ हा अधिक समतोल असून आम्हाला यावेळी जेतेपदाची निश्चितच संधी असल्याचे कर्णधार कौरने म्हटले आहे.
