Anshika Chonkar talks about journey :’इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोचं सध्या १६ वं पर्व सुरू आहे. या सीझनमध्ये अंशिका चोणकर ही मराठमोळी स्पर्धक सहभागी झाली आहे.

‘ इंडियन आयडॉल ‘ या लोकप्रिय कार्यक्रमात एकापेक्षा एक सुमधुर गायक आपल्या गायकीनं रसिकश्रोत्यांची मनं जिंकून घेत आहे. त्यात मराठमोळी अंशिका चोणकर हीसुद्धा तिच्या प्रत्येक सादरीकरणानं परीक्षकांसह प्रेक्षकांनाही थक्क करते. आजवर अंशिका वेगवेगळ्या रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. पण रिअॅलिटी शोमधून मिळालेलं यश ही केवळ सुरुवात असते, खरी परीक्षा त्यानंतर सुरू होते, असं मत तिनं ‘मुंटा’शी बोलताना व्यक्त केलं.
‘इंडियन आयडॉल’च्या सोळाव्या सीझनमध्ये अंशिका अंतिम आठ स्पर्धकांमध्ये टिकून आहे. या कार्यक्रमानं दिलेली नवी ओळख, प्रेक्षकांचं प्रेम आणि पुढील वाटचालीबाबत तिनं भावना मांडल्या. “इंडियन आयडॉल’ शोमध्ये मला अनेक चांगल्या संधी मिळाल्या. मुख्य म्हणजे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं. आतापर्यंत लक्षात राहिलेली आठवण म्हणजे सुरुवातीला माझं एक सादरीकरण परीक्षकांना इतकं आवडलं होतं, की कार्यक्रमाचे नियम मोडून चौथा प्लॅटिनम माइक देण्यात त्यामुळे दरवेळी उत्तमच सादरीकरण करायचं, या जबाबदारीनंच मी मंचावर उभी राहते’, असं अंशिका म्हणाली.
रिअॅलिटी शो संपल्यानंतर संघर्ष सुरू होतो, असं मत मांडत स्पर्धेपेक्षा लाइव्ह शो आणि कॉन्सर्ट्स अधिक महत्त्वाच्या असल्याचं अंशिकानं सांगितलं. ‘स्पर्धा संपल्यानंतर स्वतःचा दर्जा कायम ठेवावा लागतो. प्रेक्षकांसमोर थेट सादरीकरण करण्याचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळे भविष्यात मी प्रत्यक्ष कार्यक्रम करण्यावर अधिक भर देणार आहे’, असं ती म्हणाली. रिअॅलिटी शोमधील स्पर्धा आणि त्यात टिकून राहण्याचं महत्त्व याविषयी तिनं सांगितलं, ‘कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल, तर प्रेक्षकांसमोर सातत्यानं येत राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे नवोदित कलाकारांसाठी रिअॅलिटी शो खूप महत्त्वाचा ठरतो.’
Kunal Kamra: पक्षाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी मला पोकळ धमक्या, पण मी घाबरणार नाही; कुणाल कामराने मनीषा कायंदे यांना सुनावलं
अंशिकाचा हा तिसरा रिअॅलिटी शो आहे. लहानपणी एका कार्यक्रमात तिनं सहभाग घेतला होता. त्यानंतर ‘सारेगमप’ मध्ये ती दिसली होती. पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर ती ‘इंडियन आयडॉल’ मध्ये सहभागी झाली. याबद्दल ती सांगते, ‘मी या शोमध्ये येण्यापूर्वी खूप निराश झाले होते. हा माझा शेवटचा रिअॅलिटी शो असेल, असं ठरवूनच मी तिथे गेले होते. पण हा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम ठरला. या शोमध्ये मिळालेल्या संधीमुळे करिअरला नवीन दिशा मिळाली.’
Mugdha Shah : बालपणी सावत्र आईकडून झालेला छळ, घरातून पळून गेली, विरार फास्टमधून उडी; मराठी अभिनेत्रीनं सांगितला कठीण काळ
‘मटा’सोबतचं नातं खास
‘माझ्या आई-वडिलांमुळे लहानपणापासून ‘महाराष्ट्र टाइम्स’ वाचायची सवय होती. दोन वर्षांपूर्वी ‘मटा कार्निव्हल’च्या उद्घाटन सोहळ्यात मला गाण्याची संधी मिळाली, तेव्हा प्रचंड आनंद झाला होता. दुसऱ्या दिवशी कार्निव्हलचा वृतांत वर्तमानपत्रात छापून आला होता. त्यात माझाही फोटो होता. मी वाचत आले, त्यात माझा फोटो येणं, हा क्षण माझ्यासाठी खास होता. त्यामुळे लहानपणापासूनच ‘मटा’शी खास नातं आहे.

