२२ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू जेकब मार्टिन यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने सर्व आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता केली. या काळात रेल्वेची नोकरी गमावल्यापासून मानसिक तणावापर्यंतचा संघर्ष त्यांनी स्वतः सांगितला.

जेकब मार्टिन यांना मोठा दिलासा
माजी भारतीय क्रिकेटपटू जेकब मार्टिन यांना तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने २००४ मधील बनावट कागदपत्रे, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या प्रकरणात त्यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे आणि विश्वासार्ह पुरावे नसल्याचे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले.
२००४ च्या यूके दौऱ्यातून सुरू झाले होते प्रकरण
निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जेकब मार्टिन यांनी या संपूर्ण प्रकरणामागची पार्श्वभूमी सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार, २००४ मध्ये एक क्रिकेट संघ खेळण्यासाठी यूके दौऱ्यावर गेला होता. त्या संघातील एक खेळाडू भारतात परतला नाही आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो तिथेच राहिला. नंतर त्याने व्हिसावर बनावट शिक्का मारल्याचा आरोप झाला आणि भारतात परतल्यावर त्याला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडण्यात आले.
मार्टिन यांचा मोठा दावा
मार्टिन यांनी दावा केला की, सुरुवातीच्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव नव्हते. मात्र चौकशीदरम्यान त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असल्याने आपले नाव या प्रकरणाशी जोडले गेले, असेही त्यांनी सांगितले.
‘२२ वर्षांत आयुष्य बदलून गेले’
या प्रदीर्घ खटल्यामुळे मानसिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झाल्याचे जेकब मार्टिन यांनी सांगितले. बीसीसीआयकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तसेच रेल्वेतील नोकरीही गमवावी लागली. या सर्व काळात प्रचंड तणाव सहन केला, मात्र आता न्यायालयाच्या निर्णयामुळे आयुष्यात मोठा दिलासा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भारतासाठी खेळले १० वनडे सामने
५४ वर्षीय जेकब मार्टिन यांनी १९९९ ते २००१ या कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १० वनडे सामने खेळताना ८ डावांत १५८ धावा केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते बडोदा संघाचे प्रमुख फलंदाज होते. याशिवाय रेल्वे आणि आसाम संघाकडूनही त्यांनी क्रिकेट खेळले होते.

