प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी आयोजकांकडून सत्कार केला जात असताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या जेष्ठत्त्वाचा मान ठेवत प्रथम त्यांना पुष्पगुच्छ देण्याचा आग्रह धरला. व्यासपीठावर दोन्ही नेत्यांकडून परस्परांचा आदर होताना दिसला. यानिमित्ताने ठाकरे आणि आंबेडकरांमध्ये नवी केमिस्ट्री निर्माण होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या भाषणांचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी वैदिक धर्म आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंकडून गेल्या काही काळात भाजपच्या कडव्या हिंदुत्त्ववादी विचारसरणीला टक्कर देण्यासाठी पुढे करण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक हिंदुत्त्वासाठी प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या भाषणातून केलेली मांडणी पूरक ठरताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी देशात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु असल्याची टीका केली. हल्लीच्या दिवसात गोमांसाच्या प्रश्नावर झुंडशाहीत बळी जातात, पण महिलेवर अमानवी अन्याय अत्याचार करणाऱ्या आरोपींचा सत्कार होतो, हे आमचे हिंदुत्व आहे काय?, असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या टीकेचा रोख भाजपच्या दिशेने होता. एकूणच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणातून केलेली वैचारिक मांडणी परस्परांसाठी पूरक अशी होती. त्यामुळे आगामी काळात शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
गोमांस-मॉब लिंचिंग आणि अत्याचारींचा सत्कार, हे आमचे हिंदुत्व नाही: उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
उद्धव ठाकरेंकडून हिंदुत्त्वाची नव्या पद्धतीने मांडणी
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना पक्ष म्हणजे ज्वलंत आणि कडव्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून ओळखला जात असे. भाजप-शिवसेना युतीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन वेळोवेळी प्रखरपणे विचार मांडले. या काळात शिवसेनेचा दलित समाजाशी संघर्ष होतानाही दिसला. रमाबाईनगर दंगल, पँथर भागवत जाधव हत्या प्रकरण त्यामुळे कायमच दलित विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राहिला. बाळासाहेबांनी दलितविरोधी भूमिका घेतल्यांचा त्यांच्यावर आरोप झाला. वरळी दंगलीतील सवर्णांच्या बाजूने भाग घेतल्याचा आरोप किंवा शिवसेनेकडून मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला झालेला विरोध या दोन मुद्द्यांमुळे शिवसेना दलितविरोधी असल्याची प्रतिमा निर्माण झाली होती.
मात्र, आता उद्धव ठाकरे शिवसेनेचा कडव्या हिंदुत्त्वाचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे सध्या प्रखर हिंदुत्त्वाऐवजी सर्वसमावेशक अशा हिंदुत्त्वाची मांडणी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेडशी युती केली होती. त्यानंतर आता वंचितसोबत युती झाल्यास ठाकरे गटाचा पाया आणखी विस्तारण्यास मदत होऊ शकते.
प्रकाशजी आपल्याला एकत्र यावं लागेल, उद्धव ठाकरेंची साद, आंबेडकरांनी टायमिंग सांगितलं
प्रकाश आंबेडकरांकडून धर्म आणि जातीविरहित समाजाचा आग्रह
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सनातन वैदिक परंपरेवर जोरदार आसूड ओढले. आपल्या देशात वैदिक आणि संत अशा दोन परंपरा आहेत. एक परंपरा विधवांना मुंडन करायला लावते आणि दुसरी परंपरा विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार देते. त्यामुळे आगामी काळात आपण कोणती परंपरा पुढे न्यायची हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. आपण एक राष्ट्र म्हणून का उभे नाही राहिलो, याचा विचार झाला पाहिजे. कारण आपण राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक असलेल्या समता आणि बंधूभाव या मुल्यांचा बळी दिल्याची टीका त्यांनी केली.
तसेच चातुर्वर्ण्य व्यवस्थेवरही प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्ला चढवला. आपल्या देशाचा हजारो वर्षांचा इतिहास पाहिला तर त्याचे वर्णन गुलामीचा इतिहास, असे करावे लागेल. मी असं मानतो की, इतिहासात गुलामी फक्त एका वर्गाची होती, उरलेले त्यामध्ये भरडले गेले. राजेशाही ही क्षत्रियांची कल्पना होती. केवळ त्यांनाच लढण्याचा अधिकार होता. त्यामुळे एकदा का क्षत्रिय राजा हरला की उरलेले सर्वजण हरले, असे मानले जायचे. कारण त्याकाळी इतरांना हातात शस्त्र घेण्याचा अधिकारच नव्हता, याकडे प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
याशिवाय, प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार कशाप्रकारे कालसुसंगत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्नही प्रकाश आंबेडकर यांन केला. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून वैदिक परंपरेवर आसूड ओढले आहेत. देशाच्या भवितव्याच्यादृष्टीने धर्म सार्वजिक कसा होईल, याची मांडणी त्यांनी केली. आपण महात्मा गांधींना मानत नाही, महात्मा फुले यांनाही मानत नाही. अलीकडच्या काळात आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानायला लागलो आहे. या तिन्ही माणसांनी धर्म कधीच नाकारला नव्हता. धर्म हा आवश्यक आहे, याची जाणीव त्यांना होती. पण धर्माच्या अधीन राहून काही करता येणार नाही, हे त्यांचे मत होते. त्यामुळे या तिघांचं भांडण हे धर्माशी नव्हे तर धर्माने सांगितलेल्या सामाजिक व्यवस्थेशी होते, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
तर आपल्याला आजोबांचा नाव घेण्याचा अधिकार नाही : उद्धव ठाकरे
ठाकरे गट- वंचित एकत्र आल्यास राजकीय समीकरणे बदलणार?
आगामी काळात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. २०१९ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काय करू शकते, याची चुणूक प्रकाश आंबेडकर यांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे वंचित आणि ठाकरे गटाची युती झाल्यास आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काहीप्रमाणात फायदा होऊ शकतो. मुंबईत दलित समाजाची संख्या मोठी आहे. घाटकोपर, रमाबाईनगर, चेंबूर, धारावी असे विशिष्ट भाग दलित व्होटबँकेची हक्काची पॉकेटस् मानली जातात. भाजप, शिंदे गट आणि मनसे एकत्र असल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी वंचितची साथ मोलाची ठरू शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत जास्तीत जास्त जागा मिळवून येथील सत्ता उद्धव ठाकरे यांना आपल्या ताब्यात ठेवता येऊ शकते.

