Aayush Bhide on Parents Death in Corona:मराठी सिनेविश्वातला अभिनेता आयुष भिडे सध्या चर्चेत आलाय. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं त्याच्या आयुष्यात सगळ्यात कठीण असा प्रसंग सांगितला.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना कायमचं गमावलं. आयुषच्या वाट्याला आलेलं हे दु:ख किती तरी मोठं होतं. त्यानं आई-वडिल दोघांनाही काही दिवसांच्या आता गमावलेलं. इतकंच नाही तर वडिलाचं निधन झालंय, हे त्यानं आईला शेवटपर्यंत सांगितलंच नव्हतं. हा सगळा काळीज पिळवटून प्रसंग, ते दिवस त्यानं महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या सेलिब्रिटी कॉर्नर या मुलाखतीत शेअर केले. हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं.
बाबांना वर्क फ्रॉम होम होतं. कधी इमर्जन्सी असली की कामाला जावं लागायचं असं नाही की ते ट्रेन ने किंवा ऑफिसच्या बसने प्रवास करायचे, मी त्यांना स्वत: गाडीने घेऊन जायचो. पण दुर्देवानं त्यांना करोनाची लागण झाली. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांना ताप आला होता. त्यानंतर चाचणी केल्यानंतर त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की, जास्त नाहीये, आपण बरा करुया, फक्त ऑक्सिजन लेव्हल कमी झाली की अॅडमिट करूया. हे सगळं ऐकल्यानंतर मी घाबरलो होतो. दुसऱ्याच्या घरी जेव्हा असं काही होतं तेव्हा आपण सहानुभूती देतो, पण जेव्हा आपल्याच सोबत घडतं तेव्हा मला कळत नव्हतं, आता करू काय? दुसऱ्या लाटेत बेड मिळत नव्हते तेव्हा. त्यानंतर गोष्टी नॉर्मल होत होत्या. पण अचानक त्यांची ऑक्सिजन लेव्हल डाऊन होत होती याच काळात आईला पण करोना झाला.
आईला करोना झाल्यानंतर मी जास्तच घाबरलो. त्या दोघांनाही अॅडमिट केलं.आता मी पळू कुठे कुठे. बाबांचे बाबा , आजोबा तेही होते. त्यांचं वय ९२ वर्षे होतं. अॅडमिट केल्यानंतर दोन तीन दिवसांनी मला फोन आला की, बाबांची तब्येत गंभीर आहे, तुम्ही या. एक इंजेक्शन हवं आहे,ते तुम्ही अरेंज करा. पण लक इतकं वाईट की ते मिळालंच नाही. मी कधीच विचार केला नव्हता की, असा काही प्रसंग माझ्या आयुष्यात, माझ्या वाट्याला येईल.
एकुलता एक मी, इन मीन आम्ही घरी तिघंच असायचो. पण बाबांचं असं झाल्यानंतर मला कळलंच नाही, हे कसं झालं…पण मी उभा होतो, कारण आई होती. तिच्यासमोर मला हे सांगणं जड जाणार होतं. आई गेली तो पर्यंत तिला माहिती नव्हतं की बाबा गेलेत. माझी भीती ही होती की, मी तिला सांगितलं आणि तिला काय झालं तर, एक धक्का मी पचवण्याचा प्रयत्न करत होतो, पटकन दुसरा आला तर मी करू काय? यानंतर आईची तब्येत काहीशी सुधारत होती. म्हणून मी आजीला, मावशीला घरी बोलावून घेतलं होतं. की मी तिला सांगेन, पण तुम्ही सांभाळायला या. या दरम्यान, मी आई समोर अभिनय करायचो की, बाबा आहेत त्याच हॉस्पिटलला,फक्त ते दुसऱ्या वॉर्डमध्ये आहेत. हे करताना मला खूप वाईट वाटायचं, ज्यांच्याकडून मी अभिनय शिकलो, माझे पहिले अभिनयातले गुरू माझे बाबा. आज त्यांच्या निधनाबद्दल आईला मला सांगता येत नाहीये, हे दु:ख होतं. मला आईला गमवायचं नव्हतं.
बाबा गेले त्यानंतर ७ मे रोजी, १४ व्या दिवशी बाबांचं डेट सर्टिफिकेट हातात आलं. तेव्हाच हॉस्पिटलमधून मला फोन आला, की आईची प्रकृती गंभीर आहे. आईला व्हेंटिलेटरवरती शिफ्ट करतोय.व्हेंटिलेटर ऐकल्यानंतर मी खचलोच. त्यानंतर मी कैलास दादा त्याला घरी बोलवलं होतं. हॉस्पिटलमधू तिसरा फोन आला तो मी उचलाच नाही, मी तो दादाला दिला. त्याने फक्त माझ्याकडे बघितलं. मला असं झालं की, सगळं संपलं, काही राहिलंच नाहीये माझ्या आयुष्यात आता. माझी मावशी, आजी घरी होत्या, सगळे रडत होते, पण माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं. कारण मला त्यांना सांभाळायचं होतं. १४ दिवसांत माझं आयुष्य पूर्णपणे बदललं.
हे मुलाखतीत सांगत असताना आयुषला त्याचे अश्रृ थांबवणं कठीण गेलं. इतक्या मोठ्या प्रसंगातून आयुष पुन्हा उभा राहिला आणि त्याने करिअरवर लक्ष केंद्रीत केलंय. आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करत असल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं. त्याची ही मुलाखत युट्यूब तसंच सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

