Headlines

अयोध्येच्या देणगीनंतर नाशिकच्या कुंभमेळ्यातही पैशांचा खेळ?:निकृष्ट कामांवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; स्थानिक कंत्राटदारांना डावलल्याचाही आरोप




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना राज्यातील सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांवरून त्यांनी थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. अयोध्येतील मंदिर उभारणीच्या देणगीवरून झालेल्या वादानंतर, आता नाशिकमध्येही कुंभमेळ्याच्या कामात भाजपच्या नेतृत्वाखाली असाच प्रकार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘कामाचा दर्जा आणि निधीचा ताळमेळ नाही’ नाशिकमधील कुंभमेळ्याची कामे आणि इतर विकासकामांच्या प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “अयोध्येतील देणगीवरून जो मोठा वाद निर्माण झाला होता, अगदी तसाच प्रकार आता नाशिकमध्ये भाजपच्या सत्तेखाली सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांबाबत पाहायला मिळत आहे. या प्रकल्पांवर काम करणारे अनेक कंत्राटदार हे बाहेरचे आहेत.” विकासकामांच्या दर्जावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ठाकरे पुढे म्हणाले, “कंत्राटदारांना या कामांसाठी जो प्रचंड निधी दिला जात आहे, त्या तुलनेत प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. त्यांना मिळणारा पैसा आणि आम्ही प्रत्यक्ष पाहत असलेला कामाचा दर्जा यांचा एकमेकांशी काहीच ताळमेळ बसत नाही.” स्थानिकांना डावलल्याचा आरोप कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या आयोजनात स्थानिक कंत्राटदारांना डावलून बाहेरच्या लोकांना कामे दिली जात असल्याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले. कामाच्या सुमार दर्जामुळे निधीचा गैरवापर होत असल्याचा थेट रोख त्यांच्या बोलण्यातून दिसून आला. विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. “कुंभमेळा श्रद्धेचा मेळा की भ्रष्टाचाराचा मेळावा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “शेकडो कोटींच्या वर्क ऑर्डर्स निघत असताना प्रशासन झोपले होते का? बनावट टेंडरच्या माध्यमातून एवढा मोठा गैरव्यवहार होत असताना जबाबदार अधिकारी कोण?” उच्चस्तरीय चौकशीची मागणी “या आरोपींना कोणाचे राजकीय संरक्षण आहे, याची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीनंतर आता कुंभमेळ्याच्या नावाने भ्रष्टाचार सुरू असेल, तर महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही.” हेही वाचा.. कुंभमेळ्यातील 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण: काँग्रेसचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल; वडेट्टीवारांसह वर्षा गायकवाड यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून 3 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक (पुतण्या) तनय महाजन याला जामनेर येथून अटक करण्यात आली आहे. ‘दै. दिव्य मराठी’ने प्रकाशात आणलेल्या या खळबळजनक घोटाळ्यावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत