Headlines

४२ गावांतील जलस्त्रोत दूषित; वर्धा जिल्ह्यातील पाण्यात आढळले नायट्रेट, भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालाने खळबळ – wardha district water sources of 42 villages have been contaminated pri


Wardha News: सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांतील जलस्त्रोत दूषित झाले आहेत. यात वर्धा आणि सेलू या दोन तालुक्यांतील दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

wardha water AI
wardha water AI(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
एकनाथ चौधरी, वर्धा: वर्धा जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात नायट्रेट आढळून आले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांतील जलस्त्रोत दूषित झाले आहेत. यात वर्धा आणि सेलू या दोन तालुक्यांतील दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या ४२ गावांमध्ये पाण्यात ४५ पीपीएमपेक्षा जास्त नायट्रेट आढळून आले आहे. यात सात गावे अतिशय धोकादायक स्थितीत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

गावागावात शुद्ध जल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा तसेच गावपातळीवर असलेल्या यंत्रणेवर आहे. शुद्ध व मुबलक पाण्यासाठी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत अनेक गावांत कोट्यवधीचा खर्च करण्यात आला. गावात स्वच्छता राहावी आणि पाणीदेखील शुद्ध मिळावे हाच हेतू विविध पाणीपुरवठा योजनांचा आहे. पाण्यासाठी वापरण्यात येणारे जलस्त्रोत शुद्ध, स्वच्छ आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. एखाद्या जलस्त्रोताच्या सभोवताल सांडपाणी असेल किंवा घाण साचलेली असेल तर त्याचा परिणाम निश्चितच स्त्रोतातील पाण्यावर होतो. त्यामुळेच गावागावात घनकचरा व्यवस्थापनावर लाखोंचा खर्चही करण्यात आला आहे. याशिवाय रसायनाने बाधित होणारे जलस्त्रोत हा देखील मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. अनेक जलस्त्रोत हे नायट्रेट सारख्या रसायनामुळे बाधित झाल्याची बाब वर्धा जिल्ह्यात सर्वेक्षणातून समोर आली आहे.
Maharashtra TimesHemlata Patil: महापालिका निवडणुकांपूर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का; डॉ. हेमलता पाटील दोन दिवसांत पक्ष सोडणार
२०२४-२५या वर्षात मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात पाणी नमुने प्रयोगशाळेतून तपासण्यात आले. यात सर्वाधिक नमुने हे मान्सून येण्यापूर्वी तपासण्यात आले आहे. यात सेलू तालुक्यातील वघाळा हे गाव नायट्रेटने सर्वाधिक बाधित असल्याचे समोर आले आहे. याशिवाय कारंजा, हिंगणघाट आणि समुद्रपूर या तालुक्यांत काही गावांमध्ये नायट्रेटचे प्रमाण आढळून आले असल्याची धक्कादायक माहिती भूजल सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. २०२४-२०२५ या वर्षात ५२० ग्रामपंचायतीमध्ये ८८० गावांत १ हजार १४४ जलस्त्रोत तपासण्यात आले आहे. एकूण १ हजार ३३० नमुने घेत ही तपासणी करण्यात आली. वर्षभरातील विविध तारखांना झालेल्या या तपासणीनंतर ४२ गावांत जलस्त्रोतामध्ये नायट्रेट हे ४५ पीपीएमपेक्षा जास्त असल्याची बाब समोर आली आहे. अहवालानुसार सेलू तालुक्यातील वघाळा या गावात १४५ पीपीएम इतके नायट्रेट आढळून आले. त्यामुळे यावर उपाय करणे अत्यावश्यक झाले आहे.

बऱ्याच गावात नायट्रेटचे प्रमाण ९६ पीपीएमपर्यंत असल्याचे तपासणीत समोर आल्याने लहान मुले, गर्भवती महिला आणि रुग्णांना याचा धोका अधिक आहे. मुलांमध्ये श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, कॅन्सरसारखे आजारदेखील संभवतात. पिण्यासाठी धोक्याचे असलेले हे पाणी ज्या स्त्रोताचे आहे. त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. उपाय शक्य नसल्यास असा स्त्रोत बंद करणे हाच पर्याय आहे.
Maharashtra Times‘लाडकी बहीण योजना’ नेमकी कशासाठी? योजनेला विरोध करणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारचं न्यायालयात उत्तर
सात गावे अतिधोकादायक स्थितीत
भूजल सर्वेक्षण आणि वर्धा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी गुणवत्तेची वेळोवेळी तपासणी केली जाते. जलस्त्रोतामध्ये सुधारणा करणे या तांत्रिक बाबीदेखील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून करणे अपेक्षित असते. पण गेल्या एक वर्षात ४२ गावांत नायट्रेटचे प्रमाण असताना यावर ठोस पाऊल उचलले गेले नाही. यात सात गावे अतिधोकादायक स्थितीत आहे, यात वाघाडा, चितोडा, नांदोरा, नागापूर, तुळजापूर, धोत्रा रेल्वे या गावांचा समावेश आहे. आता अहवाल समोर आल्यावर मात्र जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून पुन्हा पाणी तपासणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विठ्ठल जाधव यांनी सांगितले. नदी व नाल्याच्या काठावर असणाऱ्या स्त्रोतांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. भूजल सर्वेक्षण विभाग , पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग, जीवन प्राधिकरण, आरोग्य विभाग असे विविध विभाग पाण्यासाठी व पाण्याच्या गुणवत्तेसाठी कार्यरत आहे.
Maharashtra TimesNashik Drug Case: काडीपेटीतून ‘एमडी’ तस्करी? दोन्ही टोळ्यांचे मुंबई ‘कनेक्शन’; शहरातले अनेकजण गुरफटले
वर्धा जिल्ह्यातील ४२ गावांत विविध स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण ४५ पीपीएमच्या वर आढळून आले आहे. वर्षभरात तपासण्यात आलेल्या विविध नमुन्यातून हे समोर आले आहे. जिल्हा परिषदेला आम्ही तसे पत्र लिहीत आहे. यावर उपाय अत्यावश्यक आहे. – मंगेश चौधरी, भूजल वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग

तालुकानिहाय बाधित गावे
■ वर्धा : ११
■ सेलू : ११
समुद्रपूर : १०
■ कारंजा : ५
■ आष्टी : ३
हिंगणघाट : २

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा