महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये गॅस गळती झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 36 कामगार बाधित झाल्याची माहिती समोर येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : महाड एमआयडीसीमध्ये अनपेक्षित आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एमआयडीसीमधील एका कंपनीत गॅस गळती झाल्याची मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसेच 36 कामगार बाधित झाल्याची घटना घडली आहे. इतक्या मोठ्या कंपनीत गॅस गळतीची घटना नेमकी कशामुळे झाली? कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. गॅस गळतीमागे नेमकं काय कारण आहे? या प्रकरणात कोण दोषी आहे? असे देखील प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी रुग्णवाहिकादेखील रवाना झाल्या होत्या. बचावकार्य युद्ध पातळीवर करण्यात आल्याची माहिती आहे.
महाडऔद्योगिक वसाहतीतील इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या गॅस गळतीमुळे कंपनीतील तब्बल ३६ कामगार बाधित झाले आहेत. त्यापैकी अमित कुमार (वय २८, मूळ रा. बिहार) आणि कल्पेश वांद्रे या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका कामगाराची प्रकृती अत्यवस्थ असून काही कामगारांवर महाड आणि मुंबई येथे उपचार सुरू आहेत.
इंडो अमाईन्स कंपनीतील प्लांटजवळ हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. गॅसगळतीचा परिणाम कंपनीतील कामगारांबरोबरच परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही जाणवला. गॅसमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
काहींची प्रकृती गंभीर
गॅसची बाधा झालेल्या ३६ कामगारांना तातडीने औद्योगिक वसाहतीतील एमएमए रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना महाडमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दोन कामगारांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत अमित कुमार यांचा मृत्यू झाल्यानंतर कल्पेश वांद्रे यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. एका कामगाराची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
गॅस गळतीचे कारण काय?
घटनेची माहिती मिळताच फॅक्टरी इन्स्पेक्टर तांबोळी आणि महाडचे प्रभारी डीवायएसपी शशिकांत पवार यांनी सकाळी दहा वाजता कंपनीला भेट दिली. त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून दुर्घटनेची माहिती घेतली. महाड औद्योगिक वसाहतीचे अधिकारीही घटनेचा तपास करीत असून, गॅसगळतीचे नेमके कारण आणि सुरक्षाव्यवस्थेतील संभाव्य त्रुटी याबाबत चौकशी सुरू आहे.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
महाड औद्योगिक वसाहतीत वारंवार गॅस गळतीच्या घटना घडत असल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनीतील सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा