NMIA International Flights: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा जुलै महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुलं करण्यात आलेल्या या विमानतळावरून लवकरच परदेशभरारी घेणं शक्य होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई: जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत नाव आल्यानंतर आता नवी मुंबई विमानतळाचा लवकरच विस्तार होणार आहे. नवी मुंबई विमानतळ परदेशभरारीसाठी काही काळापूर्वीच सज्ज झालं होतं. त्यासाठी अखेर तारीख जाहीर झाली आहे. 15 जुलैपासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आणि मालवाहतूक सुरू होणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
सर्वप्रथम मालवाहतुकीला सुरुवात
नवी मुंबई विमानतळावर डिसेंबर 2025मध्ये उड्डाणांना सुरूवात झाली. त्यानंतर हळूहळू विमानतळावर 24 तास सेवा सुरू करण्यात आली. आता प्रथम विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीला सुरूवात होणार असून नंतर हळूहळू ठराविक प्रवासी उड्डाणे हाताळली जातील अशी माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे सीईओ बी.व्ही.जे.के. शर्मा यांनी दिली आहे. मुंबईतील ‘बीसीबीए लॉजिस्टिक कॉन्क्लेव्ह’च्या वेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. हळूहळू मालवाहुतीच्या ऑपरेशन्समध्ये वाढ करण्याचं विमानतळाचं उद्दिष्ट आहे.
15 जुलै 2026पासून विमानतळावरून आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या उड्डाणांना सुरूवात होणार आहे. साप्ताहिक 18 विमान उड्डाणांचं त्यांचं लक्ष्य आहे. तसचं, प्रवासी उड्डाणांसाठी हालचालीही सुरू आहेत. त्यामुळे 15 जुलैपर्यंत प्रवाशांसाठीही उड्डाणांना सुरूवात होण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस आणि इंडिगो या दोन विमान कंपन्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानतळावर सेवा देतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे पश्चिम भारतात हवाई वाहतुकीचे हे एक महत्त्वाचं ठिकाण बनणार आहे.
5 जुलैपर्यंत अधिसूचना जारी करणार
या विस्तारासाठी अंतिम टप्प्यात तयारी सुरू आहे. सीमाशुल्क अधिकारी याची पाहणी करत आहेत. ‘सेंट्रल बोर्ड ऑफ इंडिरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स’ने (CBICS) मंगळवारीच विमानतळाची पाहणी केली. आंतराराष्ट्रीय उड्डाणांसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या अधिसूचना देण्यात आल्या आहेत. शेवटची पाहणी काल सुरू होती. त्यानंतर चाचणी फेऱ्या सुरू होतील. 5 जुलैपर्यंत सीमाशुल्क अधिकारी ट्रेड नोटीस जारी करतील.
नवी मुंबई विमानतळावर वाहतूक सुरू झाल्यापासून मुंबई विमानतळासाठी हा एक महत्त्वाचा पर्याय बनला आहे. दररोज 150 उड्डाणं हाताळली जात असून 20,000 प्रवासी प्रवास करतात. येत्या काही महिन्यांत जसजसा सेवांचा विस्तार होतो तसं प्रवाशांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. वर्षाअखेरीस विमानतळावर दररोज 50,000 प्रवासी हाताळण्याचं उद्दिष्ट आहे. तसेच, हवाई वाहतुकीची संख्या 380वर पोहोचण्याची शक्यता आहे.
याशिवाय नवी मुंबई विमानतळावर दुसऱ्या टर्मिनलचा विस्तारसुद्धा होणार असल्याची माहिती शर्मांनी यावेळी दिली. यापूर्वी तयार केलेल्या योजनेत 3 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असलेलं टर्मिनल उभारण्यात येणार होतं. आता आणखी मोठ्या टर्मिनलचा विचार सुरू असून पुन्हा आराखडा तयार केला जात आहे. 5 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेलं टर्मिनल डिझाइन करण्यात येत आहे. येत्या काही वर्षांमध्ये विमानतळाला मेट्रो लाइन 8, हाय स्पीड रेल्वे आणि रस्ते-उड्डाणपुलांमुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा