दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा ‘पंढरीची वारी’ (१९८८) हा चित्रपट याच पठडीतील एक अजरामर कलाकृती म्हणावी लागेल. दरवर्षी आषाढी एकादशी आली की, टीव्हीवर लागणारा हा चित्रपट आणि त्यातील भक्तीरस आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. निर्माते दिवंगत आण्णासाहेब घाटगे यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. पण यासिनेमाच्या निर्मितीची देखील एक लांबलचक अशी एक कथाच आहे. अनेक अडथळे पार करत , न खचता आण्णासाहेब घाटगे यांनी हा सिनेमा पूर्ण केलाय.
वारीची अनुभूती, वारकऱ्यांची विठ्ठलाप्रती असलेली अथांग श्रद्धा आणि वारीच्या वाटेवर घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींना रुपेरी पडद्यावर हुबेहूब जिवंत करणारा चित्रपट म्हणजे ‘पंढरीची वारी’. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही, म्हणजेच २०२६ मध्येही तसूभरही कमी झालेली नाहीए. आजही सिनेमा आवडीनं पाहिला जातो. आषाढी वारी जवळ आली की सिनेमाची चर्चा ठरलेली आहे.
४ वर्षे रखडलं होतं शूटिंग
एका भीषण कार अपघातात अरुण सरनाईक यांचं दुर्दैवी निधन झालं, तर अभिनेत्री रंजना यांना कायमचे अपंगत्व आलं.या मोठ्या संकटामुळं आणि सुमारे १८ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीमुळं चित्रपटाचे काम तब्बल ४ वर्षे रखडलं होतं.
आण्णासाहेब घाटगे यांचे चिरंजीव निशांत घाटगे यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अरुण सरनाईक यांच्या निधनाचा भावुक असा प्रसंग शेअर केला आहे.
२१ जून १९८४ रोजी माझे बाबा म्हणजे आमचे अण्णा निर्माते कै.आण्णासाहेब घाटगे यांच्या म्हणजे आमच्या”पंढरीची वारी” या चित्रपटाचा मुहूर्त होता. सगळे आपपल्या कामात व्यस्त. आळंदी मध्ये चित्रपटाच्या शूटिंगची सगळी तयारी झाली होती. सगळे तंत्रज्ञ पुढे गेले होते. सगळे कलाकर एकत्र निघायचे ठरलं होतं.आम्ही अरुण सरनाईक यांची वाट पहात होतो.तेवढ्यात ज्या हॉटेलमध्ये आम्ही रहात होतो तिथे काउंटरला माझ्या बाबांसाठी कॉल आला होता. मी पण त्यांच्यासोबत बाहेर आलो होतो. फोनवर काहीतरी माझ्या बाबांनी ऐकलं त्यांच्या हातून रिसिव्हर खाली पडला.माझे बाबा एकदम खाली बसले.त्यांच्या अंगाला घाम सुटला होता. मला काहीच सुधरत नव्हतं.मी जोरात ओरडत हॉल मध्ये गेलो सगळे धावत माझ्या बाबांजवळ आले…मग माझ्या बाबांनी सांगितल की अरुणजी अपघातामध्ये गेले. असा हा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग निशांत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलाय.
अरुण सरनाईक यांच्या निधनानंतरही अनेक अडचणी आल्या.अखेर आण्णासाहेब घाटगे आणि दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांनी धीर न सोडता मुख्य भूमिकेसाठी बाळ धुरी आणि जयश्री गडकर यांना घेऊन हा चित्रपट पूर्ण केला. पुणे ते पंढरपूर या प्रत्यक्ष पालखी मार्गावर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आल होतं. एका साध्या ग्रामीण वारकऱ्याचा वारीतील प्रवास, त्याचा कौटुंबिक संघर्ष आणि विठ्ठलावरील भक्तीचे अतिशय भावस्पर्शी चित्रण यात पाहायला मिळतं.
Amin Hajee : ‘मी त्याला रडताना पाहिलंय, घटस्फोटासाठी केवळ एका व्यक्तीला दोष देणं चुकीचं’, आमिर खानबद्दल लोकप्रिय अभिनेत्याचं वक्तव्य
बाळ धुरी आणि जयश्री गडकर
विठ्ठलभक्त अण्णा आणि त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत या दोघांनी जीव ओतला होता.अशोक सराफ, राजा गोसावी आणि राघवेंद्र काडकोळ यांच्या भूमिकाही विशेष गाजली. वारीमध्ये चोरीच्या उद्देशाने सामील झालेल्या तीन चोरांची (सदा, नाना आणि गणा) भूमिका या त्रिकुटानं साकारली होती. त्यांच्या विनोदी आणि नंतर बदलणाऱ्या स्वभावानं चित्रपटाला एक वेगळी उंची दिली.

