Maharashtra Weather: राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पण गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून पुन्हा तापमान वाढलं आहे. १२ जुलै रोजी राज्यात सर्वत्र हवामान कसं असेल ते जाणून घ्या.

प्रशांत महासागरात चक्रीवादळ
११ जुलै रोजी उपग्रहातील छायाचित्रांमध्ये देशातील सुमारे ७० ते ८०% परिसरात मान्सूनचे ढग गायब झालेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच संपूर्ण देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होणं चिंताजणक वाटू लागलं आहे. पण या प्रश्नाचं उत्तर पश्चिम प्रशांत महासागरामध्ये दडलेलं आहे. हिंदी महासागरातील आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे आणि महासागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात मोसमी पाऊस होतो आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला चालना मिळते. पण पश्चिम प्रशांत महासागरात सध्या एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होत आहे. या वादळामुळे हिंदी महासागरातील आर्द्रता आणि वाऱ्यांचा प्रवाह त्या दिशेने खेचला जात असून भारतापासून दूर जात आहे. यामुळे मान्सूनचा प्रवाह कमकुवत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमकुवत होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जुलै महिन्यात सरासरीच्या ९४ % टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम आणि पूर्व भारतात चांगला पाऊस झाला पण मध्य भारतातील राज्यांमध्ये अजूनही मान्सून कमकुवतचं आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये मान्सून पुन्हा मजबूत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोकण विभागात १२ जुलै रोजी हवामान कसं असेल?
पालघर, ठाणे, मुंबई आणि कोकणात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता पावसाची तीव्रता कमी झाली आहे. रविवारी या भागांमध्ये हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमीच राहील.
उत्तर महाराष्ट्र आणि खान्देश
रविवारी, १२ जुलै रोजी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसं असेल?
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये आज पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. पण घाट माथ्याच्या क्षेत्रांमध्ये मध्यम मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. शिवाय सांगली आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे आज प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
El Nino वेगाने सक्रिय, कमी पावसाचा अंदाज असताना धो-धो बरसला; हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
मराठवाडा आणि विदर्भातील हवामान अंदाज
छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला असून परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये तर वातावरण कोरडे राहणार आहे. दरम्यान, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पावसाने विश्रांती घेतली असून हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

