सांगरूळ -मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पासार्डे येथील जिल्हा परिषद शाळेची सुरक्षा भिंत कोसळली. यावेळी भिंतीनजीक असलेला विजेचा खांबही मोडून पडला. शाळा सुरू नसताना तसेच त्या ठिकाणी मुले नसताना ही घटना घडल्याने जीवितहानी टळली. मात्र, याभिंतीच्या निकृष्ट कामामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
२०० फूट लांबीची ही सुरक्षा भिंत पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. मात्र, बांधकामाच्या पहिल्याच वर्षी झालेल्या पावसात या भिंतीचा १०० फूट भाग कोसळला होता. त्यावेळीच या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. उर्वरितभिंत तरी सुरक्षित राहील अशी अपेक्षा होती; पण गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मारा सहन न झाल्याने ही उर्वरित भिंतही कोसळली.भिंत आणि विजेचा खांब थेट मुख्य रस्त्यावरच आडवे पडल्यामुळे आरडेवाडी आणि उपबडे या गावांना जोडणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता.
