Headlines

जगातील ‘टॉप १०’ बंदरांपैक एक, सर्वांत मोठी जहाजे येणार; ‘वाढवण’मुळे विकासाला वेग मिळणार असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास| Maharashtra Times


Vadhavan Port Project: रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाढवण बंदराची पाहणी केली. या बंदरामुळे पालघर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील इतर प्रकल्पांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली.

वाढवण बंदर विकास
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. वृत्तसेवा, डहाणू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी डहाणूच्या चिंचणी समुद्रकिनाऱ्यावरून वाढवण बंदर प्रकल्पाचा आढावा घेतला. ‘पुढील ३० वर्षे राज्याची व देशाची अर्थव्यवस्था वाढवण बंदरामुळे वेगाने विकसित होईल. हे बंदर देशाच्या विकासाचे महत्त्वाचे पान आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.

३० ते ४० टक्के भूसंपादन पूर्ण

वाढवण बंदराचा जगातील १० बंदरांमध्ये समावेश असून, येथे जगातील सर्वांत मोठी जहाजे येऊ शकतील. जेएनपीटीची कार्यक्षमता ७० लाख मेट्रिक टन कंटेनर व मालहाताळणीची आहे. वाढवण हे त्यापेक्षा तीनपट कार्यक्षमतेचे बंदर आहे. त्याची खोली २० मीटर असून, देशातील हे एकमेव असे क्षेत्र आहे. बंदराचा विकास स्थानिक नागरिक व मच्छिमारांना विश्वासात घेऊन करायचा असून त्यांच्याशी सकारात्मक संवाद सुरू आहे. बंदरामुळे १० लाख रोजगारनिर्मिती होईल, ३० ते ४० टक्के भूसंपादन पूर्ण होऊन काम वेगाने सुरू आहे. येथील मच्छिमारांसाठी मासेमारी बंदर उभारणी करायची आहे. त्यांचा व्यवसाय वाढून उत्पादने निर्यात होतील असा प्रयत्न आहे’, असे फडणवीस यांनी नमूद केले.

Maharashtra TimesVadhavan Port Highway: वाढवण बंदरासाठी आठपदरी महामार्ग, राष्ट्रीय महामार्गला थेट जोडणार; खारफुटी तोडण्यास हायकोर्टाची मंजुरी

‘या बंदरासह विरार-अलिबाग कॉरिडोर, बोईसर व विरार स्थानके, तसेच विरारनजीक विमानतळ उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पांमुळे चौथ्या मुंबईची निर्मिती होऊन आर्थिक गुंतवणूक वाढेल. आर्थिक परिवर्तनात स्थानिकांना सामावून घेण्यासाठी येथील आयटीआयचे अद्ययावतीकरण, मोठ्या मत्स्यव्यवसाय संस्थांची निर्मिती, तसेच कौशल्य विकासाचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार मार्गी लावत आहे. बळाचा वापर न करता संवादानेच जमीन संपादन केली जात आहे’, असेही त्यांनी अधोरेखित केले.

तीन वर्षांत प्राथमिक काम पूर्ण करणार

‘बंदर उभारणीच्या प्रारंभीच्या काळात अफवा पसरवल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता. तो दूर करण्यात आला. ग्रामस्थांच्या प्रतिसादामुळे लवकरच बंदर पूर्ण करण्यात येईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘बंदराच्या नियामक मान्यता ९० टक्के पूर्ण झाल्या, तर उर्वरित मान्यता लवकरच मिळतील. स्थानिकांना विकासाचा भाग केल्याशिवाय कुठलाही विकास साधला जाऊ शकत नाही. बंदराच्या कामाला प्रारंभ झाला असून तीन वर्षांत बंदराचे प्राथमिक काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. जिल्हा यंत्रणा, पालकमंत्री, मत्स्यव्यवसायमंत्री आदी माध्यमांतून पुढचे नियोजन केले आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाढवण येथून चांगला रस्ता तसेच फ्रेटकॉरिडोरसह अन्य रस्त्यांना मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीचे काम केले आहे. विकासाने लोकांचे भले होईल म्हणूनच विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरण अस्तित्वात असून त्यांच्या सर्व निर्बंधांमध्ये शिथिलता यावी, अशी अपेक्षा नाही. मात्र, विकासासाठी आवश्यक शिथिलता आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesPune-Mumbai Expressway: २०३०पर्यंत पुणे-मुंबई महामार्ग दहापदरी! सुधारित आराखडा सरकारसमोर सादर; वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार

डहाणूची निसर्गसंपन्नता सुरक्षित राखण्यासाठी या बंदरासाठी किनाऱ्यापासून ५ किमी आत रस्ता तयार केला जाणार आहे. तेथील जैवविविधता लक्षात घेऊन तेथे व्यावसायिकपेक्षा निवासी नियोजन केले आहे. आवश्यक बदल प्राधिकरणाकडे जाऊन केले जातील’, असे त्यांनी नमूद केले. यावेळी वनमंत्री, तसेच पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा