![]()
चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध आरोप करत त्यांच्या विभागीय चौकशीसह तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी चोपड्यात सर्वपक्षीय जनआंदोलन करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार, शेतकरी आणि नागरिकांच्या सहभागामुळे आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततेत मोर्चाला प्रारंभ झाला. घोषणाबाजी करत शेकडो आंदोलनकर्ते तहसील कार्यालयावर पोहोचले. प्रांताधिकारी अमळनेर हे अन्य प्रशासकीय कामामुळे उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या वतीने नायब तहसीलदार रविंद्र जोशी यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाकडे तातडीने पाठविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. मोर्चानंतर झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत निष्पक्ष विभागीय चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सभेत निवृत्त मंडळ अधिकारी अमृतराव वाघ यांनी तहसीलदारांविरोधात अत्यंत तीव्र भूमिका मांडली. त्यांनी तहसीलदारांवर सर्वसामान्य नागरिकांशी अयोग्य वर्तन, विविध कामांसाठी सतत पैशांची मागणी, कार्यालयीन कारभारातील अनियमितता तसेच अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर आरोप केले. तसेच आपल्या आरोपांबाबत पुरावे सादर करण्याचा दावाही त्यांनी केला. वाघ यांनी सांगितले की, हे महाशय लग्नात दारू पिऊन नाचतात. वाळू अवैध सुरु ठेऊन कोट्यावधी रुपये त्यांनी कमविले आहेत. अंमळनेरमध्ये जशी वाळू प्रकरणात कारवाई झाली तशी कारावाई चोपड्यात थोरात यांच्यावर व्हावी अशी मागणी वाघ यांनी केली. राजयातील सर्वात भ्रष्ट माणूस तापी नदीच्या पात्रातून नाशिक मुंबई सारख्या मोठ्या शहरात दररोज शंभर डम्पर वाळू थोरात यांच्या आशीर्वादाने जात होती. चोपडा तालुक्यातील शेतकरी आत्महत्याकडे दुर्लक्ष, संजय गांधी योजनेत सर्वात कमी प्रकरणे यांच्या काळात झाली आहेत, राज्यात भष्ट्र माणूस म्हणून थोरात यांचा नंबर अग्रक्रमाणे घेतला जाईल, असे त्याचे कृत्य असून त्यांना आजच जागेवर बडतर्फ करण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली. यावेळी गोपाळराव सोनवणे, बाळासाहेब पाटील, शशिकांत देवरे, अमृतराव वाघ, मगन बाविस्कर, दीपक सोनवणे, शुभम सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट यावेळी आंदोलनातं चोसाका चेअरमन चंद्रहास गुजराथी, मनसेचे नेते अनिल वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्या महाजन, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील, प्रदीप पाटील, मगन बाविस्कर, रवींद्र मराठे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे सुनील बडगुजर, शशिकांत कन्हैये, नंदलाल चौधरी, अमृतराव वाघ, शशिकांत देवरे, संजय कानडे, अजय पालीवाल, शशिकांत पाटील, विलास पाटील, नंदलाल मराठे, भरत धनगर, किशोर दुसाने, अमोल राजपूत, समाधान पाटील, निलेश बारी, विकी सिंधी, तुकाराम पाटील, प्रल्हाद पाटील, शामकांत परदेशी, उर्वेश साळुंखे, प्रफुल्ल स्वामी, मुन्ना शर्मा, तुळशीराम पाटील, डॉ. रोहन पाटील, गटनेते गजेंद्र जयस्वाल, गिरीश देशमुख, रणजीत देशमुख, लहूश धनगर, सुनील सोनगिरी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आंदोलन शांततेत पार पडले. प्रशासनाने निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शासनाकडून लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, आता या मागण्यांवर महसूल प्रशासन आणि शासन कोणती भूमिका घेते, याकडे चोपडा तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी पोलिसाचा बंदोबस्त दिसून आला.
Source link
चोपड्यात तहसीलदार भाऊसाहेब थोरातांविरोधात सर्वपक्षीय एल्गार:तात्काळ निलंबन आणि चौकशीसाठी जनआंदोलन, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
