Headlines

गोंदियात पावसाचा कहर! इमारत कोसळल्यानं मायलेकांचा मृत्यू, भामरागड तालुक्यात २ दिवसांपासून पूर कायम – vidarbha weather updates heavy rain in gondia district mother-son died due to building collapse pri


गोंदिया: पूर्व विदर्भात दोन दिवसांपासून बरसणाऱ्या दमदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भामरागडमध्ये मंगळवारीही पूर कायम असल्याने ४०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. गोंदियात २८५ मिमी इतक्या तीव्र अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या पावसामुळे फुलचूर नाल्यात इमारत कोसळून मायलेकांचा मृत्यू झाला. वाघ नदीला पूर असतानाही वाट काढण्याचा प्रयत्न करीत असताना डिझेल टँकर वाहून गेला. जवळपास ४४ मार्गांवरील वाहतूक ठप्प पडली. भंडारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज, बुधवारी शाळांना सुटी देण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत तुरळक सरींचा अपवाद वगळता पाऊस झाला नाही.

गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी तीव्र अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. फुलचूर नाक्याजवळील नाल्याला आलेल्या पुरात पहाटेच्या सुमारास दुमजली इमारत कोसळली. यात वाहून गेल्याने आईचा तर ढिगाऱ्याखाली दबून मुलाचा मृत्यू झाला. दिपीन अग्रवाल (२७) आणि किरण अग्रवाल (५०) अशी या मायलेकांची नावे आहेत. अनिल अग्रवाल (५२) हे बचावले आहेत. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. इटियाडोह धरणाच्या सांडव्यावरून तीन फूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गाढवी नदी ओसंडून वाहत केशोरी-खोळदा मार्गावरील वडेगाव (बंध्या) गावाजवळच्या गाढवी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने केशोरी-ब्रह्मपुरी बससेवा ठप्प पडली होती. या परिस्थितीमुळे रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी अडकून पडले. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी फुलचूर, फुलचूर टोला, शहरातील काही भाग, मुररी, पिंडकेपार या भागात भेटी देऊन पुरपरिस्थीची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. अतिवृष्टीमुळे गोंदिया जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला तर ५५६ घरांचे अशंत, सहा घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. छोटा गोंदिया येथील पांगोली नदी परिसरात सुरू असलेल्या अंडरग्राउंड ड्रेनेज पाइपलाइन कामावरील आठ मजुरांना आपत्ती निवारण बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले.

४४ मार्गांवरील वाहतूक थांबली
मुंडीपार-उमरी, मुंडीपार-बाजारटोला, सरकारटोला-महारीटोला, ठाणा-बोथली, खुर्थीपार-ठाणाटोला, आसोली-फुक्कीमेठा, जांभूळटोला, घाटटेमणी-मध्य प्रदेश, भोसा-मोहगाव यासह जवळपास ४४ मार्गांवरील वाहतूक ठप्प पडली आहे.

वाघ नदीत डिझेल टँकर वाहून गेला
वाघ नदीला आलेल्या पुरातून वाट काढण्याचा प्रयत्न करणारा डिझेल टँकर वाहून गेला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजता घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाघ नदीला पूर आल्याने देवरी तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या परिस्थितीतही एका टँकरचालकाने पुरातून वाहन नेण्याचा प्रयत्न केला. प्रवाह अधिक असल्याने टँकर वाहून गेला. तर दुसरीकडे याच तालुक्यात गंगा देशलाहरे (५३), हरी देशलाहरे (४५) रा. खैरागड ( छत्तीसगड) व अनिल सूरजभान बागडे रा. शिरपूरबांध (देवरी) या तिघांना बाहेर काढण्यात आले.

भामरागडमध्ये पूर कायम
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मंगळवारी; दुसऱ्या दिवशीही भामरागडमध्ये पूरपरिस्थिती कायम आहे. दोन राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गांसह जिल्हा परिषदेचे अंतर्गत १७ मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे अतिदुर्गम भागातील वाहतूक व्यवस्था ठप्प पडली आहे.

दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. छत्तसीसगडच्या सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रावती नदीला पूर आल्याने गडचिरोली जिल्ह्याला फटका बसला आहे. सोमवारी सकाळपासून भामरागडला जोडणारा पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे. भामरागडमधील २०० घरे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. बाजारपेठ सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली होती. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तब्बल ४०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. पूरपरिस्थितीमुळे भामरागड-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग तीन ठिकाणी नाल्याला पूर असल्याने बंद अवस्थेत आहे. सिरोंचावरून छत्तीसगडच्या भोपालपट्टणमकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग सोमनपल्लीजवळ इंद्रावती नदीच्या पुरामुळे बंद पडला आहे. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर एका पुलाचे बांधकाम तीन वर्षांपूर्वी झाले होते. मात्र चुकीच्या पद्धतीने हे पुलाचे बांधकाम झाल्याने काही ठिकाणी पुराचे पाणी रस्त्यावर येते. परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक थांबलेली आहे. रात्रीच्या सुमारास एका कारचालकाने पुरातून गाडी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची कार वाहून गेली. वेळीच चालक आणि इतर दोघांना बाहेर उड्या मारल्याने ते बचावले.

हातातोंडाशी आलेली मिरची गेली; ४०० हेक्टरवरील पीक उखडून फेकलं, अति पावसामुळे शेतकऱ्यांना फटका

बोटीच्या सहाय्याने रुग्णाला मदत
भामरागड तालुक्यातील दोघांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना बचाव पथकाने रुग्णालयात दाखल केले. भामरागड तालुकास्थळापासून तीन किमीवरील दुबागुडमला पुराचा वेढा असल्याने बोटीच्या सहाय्याने गावातील महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पावसाने मंगळवारी उसंत घेतल्याने पूरस्थिती सुरळीत होण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी संजय दैने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

‘लोअर वर्धा’चे सात दरवाजे उघडले

आर्वी तालुक्यातील धनोडी येथील लोअर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याने सात दरवाजे उघडण्यात आले आहे. हे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा, देवळी, आर्वी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा धरणातून १९१.१५ घनमीटर प्रती सेल्सिअस एवढा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या वर्धा जिल्ह्यातील सात लघु प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यात पोथरा, पंचधारा डोंगरगाव, मदन उन्नई, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघु प्रकल्पाचाही समावेश आहे. यासोबतच समुद्रपूर तालुक्यातील नांद प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.
Maharashtra TimesMadhya Vaitarna : नदीचे पाणी अचानक वाढले! दोघे प्रवाहात अडकले, थरार पाहून काठावरचे शहारले
भंडारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’; शाळांना सुटी जाहीर
भंडारा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाल्याच्या काठावरील गावांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आज, बुधवारी सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार रविवारी रात्रीपासून भंडारा जिल्ह्यात सर्वदूर संततधार पावसाला सुरुवात झाली. पावसाची संततधार रात्रभर आणि सोमवारी दिवसभर सुरूच होती. या पावसामुळे वैनगंगेचे जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यातच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठा पाऊस झाल्याने गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने भंडारा ते कारधा (जुना पूल), साकोली तालुक्यातील साकोली ते खैरलांजी, सोनपुरी ते बोदरा, आमगाव ते बांपेवाडा, लाखांदूर तालुक्यातील तई ते बारव्हा, तई ते पाऊलदवना, बोथली ते बारव्हा हे मार्ग बंद करण्यात आले.

प्रकल्पांचे दरवाजे उघडले
गोसेखुर्द : ३३
पुजारीटोला : १३
बावनथडी : ०४
संजय सरोवर : ०६
धापेवाडा : १७
लोअर वर्धा : ०७

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत