![]()
काही तारखा अविस्मरणीय ठरतात. कारण त्या दिवशी काही विलक्षण घटना घडलेली असते म्हणून नव्हे, तर त्या समाजाला माणुसकीची जाणीव करून देतात म्हणून. 20 जुलै ही अशीच एक तारीख आहे. हे वाचताना तुम्हाला एका घटनाक्रमाचे स्मरण होत असले तरीही त्याकडे मी नंतर येईन. पण त्याआधी तुम्हाला 20 जुलै 2024 या दिवशीच्या आयआयटी कानपूरमध्ये घेऊन जातो. खरे तर या कथेची सुरुवात खूप आधी झाली होती. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. एच.सी. वर्मा यांनी तिची बीजे पेरली होती. त्यांचा विश्वास होता की, अगदी छोटेसे योगदानही असामान्य बदल घडवू शकते. आयआयटी कानपूरमध्ये प्राध्यापक एमेरिटस राहिलेले प्रा. वर्मा यांनी 1994 ते 2017 या काळात तेथे भौतिकशास्त्र शिकवले. त्यानंतर त्यांनी कॅम्पसमधील अपॉर्च्युनिटी स्कूलमध्ये विशेष सल्लागार म्हणून काम केले. 1964 मध्ये स्थापन झालेली ही शाळा कॅम्पसमध्ये राहणाऱ्या सहायक कर्मचाऱ्यांच्या तसेच आसपासच्या गरजू कुटुंबांतील मुलांना मोफत शिक्षण देत आहे. यांपैकी अनेक मुले उपाशीपोटी शाळेत येत होती. काही प्रार्थनेसाठी उभी असताना बेशुद्ध पडत. काहींचे अभ्यासात मन लागत नसे किंवा ती शाळेतच येत नसत. कारण उपाशीपोटी शिक्षण घेणे अशक्य असते. प्रा. वर्मा यांना ही परिस्थिती बदलायची होती. 2017 मध्ये त्यांच्या मनात एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलांना पौष्टिक आहार देण्याची कल्पना प्रथम आली. मात्र निधी उभारणीवरील मतभेदांमुळे ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. 2024 मध्ये या कल्पनेवर पुन्हा चर्चा झाली. त्या वेळी दुसरी अडचण अशी होती की, स्वयंसेवी संस्थेने जितके विद्यार्थी अपेक्षित धरले होते तितके त्या शाळेत नव्हते. पण हार न मानता आयआयटी समुदायाने स्वतःच मार्ग शोधला. एअरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्राध्यापक टी.के. गुहा, जे हॉल-5चे वॉर्डनही होते. यांनी मेस व्यवस्थापक अंशू जोशी यांच्या मदतीने एक सोपा उपाय शोधला. हॉल-5मधील प्रत्येक विद्यार्थी आपल्या खिशातील खर्चातून दर आठवड्याला फक्त 5 रुपये देईल असे ठरले. आणि 20 जुलै 2024 रोजी मुलांना पहिले पौष्टिक जेवण देण्यात आले. सुरुवातीला हा एक छोटासा प्रयोग वाटत होता. पण लवकरच त्याचे मोहिमेत रूपांतर झाले. नोव्हेंबर 2024 पर्यंत हॉल-1, 3 आणि 8 तसेच गर्ल्स होस्टेल-1ही या उपक्रमात सहभागी झाले. त्यामुळे मुलांना आठवड्यातील पाचही शालेय दिवशी पौष्टिक आहार मिळू लागला. स्टुडंट्स जिमखाना आणि होस्टेल अफेअर्सच्या कौन्सिल ऑफ स्टुडंट्सच्या माध्यमातून या उपक्रमाची माहिती पसरत गेली आणि अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होत गेले. आज आयआयटी कानपूरमधील 1,649 विद्यार्थी दर आठवड्याला 5 रुपयांचे योगदान देतात. यामागचे गणित अतिशय सोपे आहे. सुमारे 250 मुलांना एका वेळचे पौष्टिक जेवण देण्यासाठी सुमारे 3 हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या मेसच्या मासिक बिलात फक्त 20 रुपयांची वाढ होते. तांदूळ, गहू, हरभरा आणि राजमा यांसारख्या वस्तूंची घाऊक खरेदी केल्यामुळे खर्च कमी राहतो आणि हा उपक्रम टिकाऊ ठरतो. मात्र या उपक्रमाचे खरे फायदे पैशांत मोजता येत नाहीत. शिक्षकांनी पाहिले की, मुले अधिक निरोगी, उत्साही आणि अभ्यासाकडे लक्ष देणारी झाली. त्यांची उपस्थिती सुधारली आणि ती अधिक आनंदी राहू लागली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक धडा शिकला. तो कोणतेही पुस्तक शिकवू शकत नाही. आपल्या वाट्यातील अगदी छोटासा वाटाही इतरांसोबत वाटला तरी तो दुसऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. आता पुन्हा 20 जुलै 2026 कडे वळूया. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत देशभरातील अनोळखी लोकांनी अन्न पोहोचवले. त्यासाठी पैसे कोणी दिले हे कुणालाही माहीत नव्हते. अन्न पाठवणाऱ्यांनाही ते कोणी खाल्ले हे माहीत नव्हते. पण कोणताही गाजावाजा न करता अन्न सतत पोहोचत राहिले. जणू करुणेने स्वतःच आपला मार्ग शोधला होता. या दोन्ही कथांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. कदाचित चांगुलपणाचे कार्यही असेच चालते. आपण केलेली भलाई कदाचित त्याच स्वरूपात आपल्याकडे कधीच परत येत नाही. फंडा असा की दयेतून केलेल्या छोट्याशा कृतीलाही कमी लेखू नका. चांगल्या कर्मांचे परत येण्याचे स्वतःचे मार्ग असतात. ती थेट आपल्यापर्यंत पोहोचली नाही तरी नंतरच्या पिढीच्या आयुष्यात नक्कीच परतात.
Source link
एन. रघुरामन यांचा कॉलम:नेकी परत येते…आपल्यापर्यंत नसली तरी आपल्या मुलांपर्यंत नक्कीच पोहोचते
