Headlines

देशातील पहिला ‘ट्रॅव्हलेटरयुक्त पूल’, विमानतळानंतर आता मुंबईत बनतोय; मेट्रो-मोनो-रेल्वेला जोडणार| Maharashtra Times


India’s First Travelator Skywalk: एमएमआरडीए महालक्ष्मी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण करण्याच्या जवळ असल्याने महालक्ष्मी रेल्वे स्थानक, मेट्रो लाइन 3 स्थानक आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक दरम्यान विनाअडथळा प्रवास करण्यासाठी सरकते पट्टे असलेला स्कायवॉक बांधला आहे.

महालक्ष्मी पूल
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: महालक्ष्मी येथे मोनोरेल, मेट्रो-३ आणि पश्चिम रेल्वेचे महालक्ष्मी स्थानक यांना जोडणारा देशातील पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त (सरकते पट्टे) पादचारी पूल अंतिम टप्प्यात आला आहे. एमएमआरडीएच्या महालक्ष्मी मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीची होणार आहे.

कसा असेल पादचारी पूल?

या प्रकल्पांतर्गत सुमारे २८३ मीटर लांब आणि ११ मीटर रुंद असा एकात्मिक पादचारी पूल उभारला जात आहे. पुलावर एकूण १७६ मीटर लांबीचे सहा ‘ट्रॅव्हलेटर्स’ बसवले जाणार आहेत. दिव्यांग प्रवाशांसह सर्वांसाठी दोन लिफ्टची सुविधाही उपलब्ध असेल. या पुलावरून दर तासाला साडेचार हजार प्रवासी ये-जा करू शकतील.

प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मोनोरेल, मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे या वेगवेगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांदरम्यान बदलण्यासाठी लागणारा वेळ सुमारे २० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये अखंड जोडणी निर्माण झाल्याने खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.

दाट नागरी वस्तीमध्ये हा प्रकल्प उभारताना मोठ्या व्यासाची पावसाच्या पाण्याची वाहिनी सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आली. तसेच जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्यांना कोणताही अडथळा न आणता काम पूर्ण करण्यात आले. बांधकामादरम्यान एकही झाड तोडण्यात आले नसून वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने साने गुरुजी मार्गावरील वाहतूक आणि गणेश विसर्जन मिरवणुकांवरही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.

खासगी वाहनांवरील अवलंबित्व घटणार

एमएमआरडीएच्या मते, हा प्रकल्प केवळ पादचारी पूल नाही. तो मुंबईतील मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वेला एका प्रवासी-केंद्री सार्वजनिक वाहतूक साखळीत जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. यापूर्वी केवळ विमानतळावर असा स्कायवॉक उपलब्ध होता. त्यानंतर मुंबईत असा प्रकल्प पहिल्यांदाच राबवला जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात महालक्ष्मी रेल्वे स्थानकालाही या स्कायवॉकशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे, मेट्रो आणि मोनोरेल अशा तिन्ही ठिकाणांसाठी इंटरचेंज निर्माण होणार आहे.

Maharashtra TimesGhatkopar Bridge: ४० वर्षे जुना रेल्वेपूल पाडून ‘केबल-स्टेड पूल’ बांधणार, घाटकोपरमध्ये कोंडी फुटणार; कसा असेल मार्ग?

दक्षिण मुंबईला चेंबूरशी जोडणाऱ्या २० किमी लांब मोनोरेल मार्गावरील अंतिम टर्मिनल संत गाडगे महाराज चौक स्थानक आहे. त्यामुळे हे स्थानक अत्यंत महत्त्वाचं असून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. तथपि, अनेकदा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोनोरेल सेवा सप्टेंबर २०२५पासून बंद आहे. सर्व दुरुस्ती आणि अपग्रेडची कामे पूर्ण झाली असून लवकरच पुन्हा शहरात मोनोरेल धावणार आहे. एमएमआरडीए सध्या मेट्रो स्थानकांना इंटरचेंजद्वारे वेगवेगळ्या मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी जोडत आहे. तसेच, मेट्रो लाइन २बीवरील चेंबूर मेट्रो स्थानकाला मोनोरेल स्थानकाशी जोडण्यात येणार आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सध्या सरकते जिने आहेत पण सतत तांत्रिक बिघाडामुळे ते बंद असल्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करतात. हे सरकते पट्टे प्रवाशांसाठी खरचं फायदेशीर ठरतील का? इतर कोणत्या ठिकाणी अशी सुविधा सुरु करू शकतो ? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा