![]()
‘शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो… तुमच्यापैकी प्रत्येकाप्रमाणेच दरवर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान हजारो विद्यार्थी आपल्या पाठीवरील बॅगपेक्षा कितीतरी मोठे ओझे घेऊन विद्यापीठात प्रवेश करतात. कधी वर्गात बसण्याची संधीच मिळाली नाही, अशा पालकांची स्वप्ने घेऊन काहीजण येतात. आजवर कुणीही पदवीदानाचा गाऊन परिधान केला नाही अशा कुटुंबातील काही जण असतात. अनेक जण स्वतः न निवडलेलीही जबाबदारी घेऊन आलेले असतात. तुमच्यापैकी कुणाचीही अशीच परिस्थिती असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही केवळ पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली नसते. तुम्ही आपल्या कुटुंबाच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहात.’ इंदूरमध्ये गुरुवारी सकाळी मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात अशाच शब्दांत केली. मी विद्यार्थ्यांना विचारले, ‘तुमच्यापैकी कुटुंबात प्रथमच पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे किती जण आहेत?’ तेव्हा अनेकांनी हात वर केले. त्यानंतर मी त्यांना एका व्यक्तीची कथा सांगितली. त्यांचा जन्म तामिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यातील एका छोट्या शेतकरी कुटुंबात झाला होता. त्या कुटुंबासाठी महत्त्वाकांक्षेपेक्षा जगणे अधिक महत्त्वाचे होते. त्यांचे वडील पहिलीनंतरच शाळा सोडून गेले होते. आई कधीच शाळेत गेली नव्हती. तिला नोटा मोजतानाही अडचण येत असे. घरात पुस्तके नव्हती. वीज नव्हती. मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. बीजगणित, भौतिकशास्त्र किंवा करिअरची निवड याविषयी समजावून सांगणारेही घरात कोणी नव्हते, कारण त्या वाटेवर आधी कुणी चाललेच नव्हते. त्यांनी कोणत्याही शिकवणीशिवाय आणि कौटुंबिक मदतीशिवाय सरकारी शाळेत शिक्षण घेतले. प्रवेश परीक्षा देण्यासाठी ते मद्रास (आताचे चेन्नई) येथे गेले. तेव्हा शिक्षकांनी त्यांना सांगितले, ‘परीक्षेवर लक्ष केंद्रित कर, इतरांच्या कपड्यांकडे नाही.’ त्यांनी तसेच केले आणि परतले. काही आठवड्यांनी एका रात्री रॉकेलचा दिवा विझल्यानंतर आई म्हणाली, ‘तुझ्यासाठी एक पत्र आले होते. ते छपराखालील बांबूमध्ये ठेवले आहे.’ त्यांनी पत्र उघडले, तर ते मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील ऑटोमोबाइल अभियांत्रिकीच्या प्रवेशाचे पत्र होते. पुढे हाच पहिल्या पिढीतील पदवीधर आर. वेलुसामी ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट विभागाचे अध्यक्ष बनले. आज वेलुसामी हजारो कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करतात. ते देशभर लोकप्रिय असलेल्या स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही-300, एक्सयूव्ही-700 आणि थार रॉक्ससारख्या गाड्या तयार करतात. आता 2026 मध्ये येऊया. आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील बिशू लिम्बूने घरात विश्वासार्ह वीज किंवा इंटरनेट नसल्याने रॉकेलच्या दिव्याच्या मंद प्रकाशात नीट परीक्षेची तयारी केली. त्यांचे वडील छोटे शेतकरी आहेत. आई प्रत्येक रुपया जपून खर्च करत होती. मात्र डॉक्टरांचा पांढरा कोट फक्त श्रीमंतांच्या मुलांसाठीच असतो, हे मान्य करण्यास बिशूने नकार दिला. त्याने नीट-2026 मध्ये 720 पैकी 610 गुण मिळवले आणि आता वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची तयारी करत आहे. आता राजस्थानातील बुंदी जिल्ह्यातील कापरेन गावातील सूरज सैनीकडे वळूया. तो बारावीपर्यंत हिंदी माध्यमात शिकला. सुट्यांमध्ये कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गावातील घरांना रंग देण्याचे काम करत असे. बारावीपर्यंत त्याला नीट परीक्षेबद्दल माहितीही नव्हती, कारण त्या मार्गावर आधी कुटुंबातील कोणी गेले नव्हते. पहिल्या प्रयत्नातून त्याला हे समजले की, योग्य दिशा नसेल तर केवळ मेहनत पुरेशी नसते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्याने अथक परिश्रम केले, 583 गुण मिळवले आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. फंडा असा की, तुमच्या प्रवेशपत्रावर फक्त तुमचे नाव असते; पण त्यातून घडणारे भविष्य संपूर्ण कुटुंबाचे असते. तुम्ही केवळ विद्यार्थी नसता तर नकाशा नसताना जंगलातून स्वतःचा मार्ग शोधणारे धाडसी वाटाडे असता.
Source link
एन. रघुरामन यांचा कॉलम:आजचे बिशू आणि सूरज उद्याचे वेलुसामी बनू शकतात
