Headlines

एकत्र विमान प्रवासावरून राजकीय कलगीतुरा:मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण?, उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर




राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका विमान प्रवासातील भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज मिश्किल पण ठाम प्रत्युत्तर दिले आहे. “मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण?” अशा शब्दांत फडणवीसांनी या वादावर भाष्य केले आहे. परभणी येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या विमान प्रवासाचा संदर्भ दिला. “प्रवासादरम्यान देवेंद्र फडणवीस मला भेटले, तेव्हा ते प्रचंड हतबल दिसत होते. ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली त्यांचे स्वतःचे वरिष्ठच त्यांचे पंख छाटत आहेत, हे त्यांनाही स्पष्टपणे जाणवत होते,” असा दावा ठाकरे यांनी केला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. फडणवीसांचे सडेतोड उत्तर – मी वेबसिरीज पाहत होतो! उद्धव ठाकरेंच्या या टोल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तितक्याच जोशात प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “मला पंखच नाहीत, तर माझे पंख कोण छाटणार? माझ्या पाठीशी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा आणि माझ्या पक्षातील वरिष्ठांचा खंबीर आशीर्वाद आहे.” फडणवीसांनी हा संपूर्ण प्रसंग स्पष्ट करताना सांगितले की, “त्या विमान प्रवासात उद्धव ठाकरे एका बाजूला आणि मी दुसऱ्या बाजूला होतो. जर आम्ही शेजारी बसलो असतो, तर नक्कीच गप्पा मारल्या असत्या. परंतु, माझी एक सवय आहे की विमानात बसल्यावर मी मोबाईलवर डाऊनलोड केलेली वेबसिरीज पाहत असतो.” आम्ही वेड्यांच्या बाजारात बसलोय का? राजकीय चर्चांवरून फडणवीस अधिक संतापले. “सर्व्हिस फ्लाईटमध्ये योगायोगाने एकत्र बसलो तर त्यावर एवढ्या चर्चा का केल्या जातात? हे सगळं पाहून मला वाटतंय की आपण वेड्यांच्या बाजारात बसलोय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सध्या राजकीय प्रश्नांपेक्षा विकासाचे प्रश्न महत्त्वाचे असून, अशा निरर्थक चर्चांनी कोणाचेही भले होणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. नेमके काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे म्हणाले होती की, “देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालपरवा ते माझ्यासोबत विमानात बसले होते. पण हतबल होते. कळतच नव्हते हे मुख्यमंत्री आहे. असा काय झाला हा. आत्मविश्वास गमावलेला माणूस. आपले पंख कापतायेत. कापणारे आपलीच माणसे आहेत. हे त्यांना कळतंय. न्याय कुणाकडे मागायचा. कोणते दार ठोठवायचे. ते दार उघडले तरी पंख कापणार. म्हणजे जे काही वाचले ते वाचून जेवढे दिवस आहेत ते ढकललेले बरे. या परिस्थितीत फडणवीस आहे.” “कदाचित उद्या फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर. नितीन गडकरी होते की नाही. अध्यक्ष होते. पुन्हा अध्यक्ष झाले असते तर पंतप्रधान झाले असते. म्हणून गडकरींचे पंख असे कापले असे कापले की त्यांच्या निष्ठेत इथेनॉलचे पाणीच घालून टाकले. भेसळ करून टाकली. आता गडकरी काय करू शकतात. उड उड उड… कसे उडणार. पंख त्यांनी छाटले,” असे उद्धव ठाकरे म्हणालेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत