Headlines

इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ते माओवाद्यांचा म्होरक्या; डोक्यावर ६ कोटींचं बक्षीस, चकमकीत ठार झालेला बसवराजू कोण होता? – maoist military command chief basavaraju killed in chhattisgarh border encounter pri


Naxalite Basavaraju Encounter: माओवाद्यांच्या संघटनेला आक्रमक बनवणारा चेहरा म्हणून त्याची ओळख होती. तो स्वत: स्फोटकतज्ज्ञ होता. बसवराजू १९७५ साली माओवादी विचारधारेच्या संपर्कात आला.

३० माओवादी ठार.
३० माओवादी ठार.(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
महेश तिवारी, गडचिरोली: माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीचा तसेच माओवाद्यांच्या मिलिटरी कमांडचा प्रमुख गंगण्णा उर्फ बसवराजू उर्फ नंबाला केशव याचा बुधवारी छत्तीसगडच्या सीमेत झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याच्या मृत्यूने माओवादी संघटना नेतृत्वहीन झाली आहे. पाचशेहून अधिक जवानांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या बसवराजूवर तब्बल सहा कोटींचे बक्षीस होते.

गुरिल्ला पद्धतीने सुरक्षा दलांवर हल्ले करण्याची पद्धत माओवादी संघटनेत बसवराजूने आणली. माओवाद्यांच्या संघटनेला आक्रमक बनवणारा चेहरा म्हणून त्याची ओळख होती. तो स्वत: स्फोटकतज्ज्ञ होता. बसवराजू १९७५ साली माओवादी विचारधारेच्या संपर्कात आला. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियन्नापेठ येथील नंबाला केशव इंजिनीअरिंग करण्यासाठी तेलंगणमधील मोठे शैक्षणिक केंद्र असलेल्या वारंगल येथे आला. याच काळात कोंडापल्ली सीतारामय्या यांनी सुरू केलेल्या माओवादी विचारधारेच्या विद्यार्थी संघटनेशी त्याचा परिचय झाला. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य चेरकुरी राजकुमार याच्यासोबत बसवराजूने विद्यार्थी संघटनेत काम केले आहे. राजकुमार नंतर महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमेवर ठार झाला.
Maharashtra TimesKarnataka News: कन्नड बोलण्यावरुन कर्नाटकात वाद, VIDEO व्हायरल झाल्यानंतर थेट बँक मॅनेजरची बदली, काय प्रकरण?
बसवराजू अल्पावधीतच माओवादी संघटनेत कमालीचा सक्रिय झाला. एमटेक केल्यांतर १९८०मध्ये तो पीपल्स वॉर ग्रुपमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून सामील झाला. या संघटनेचे प्रमुख कोंडापल्ली सीतारामय्या यांनी दंडकारण्यात माओवादी संघटनेचा विस्तार करण्यासाठी पाच दलम तयार केले. यातील एका दलमचे नेतृत्व बसवराजूकडे देण्यात आले. त्याला आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात पाठवण्यात आले. तिथे काही वर्षे काम केल्यानंतर १९८५च्या सुमारास कोंडापल्ली सीतारामयांच्या सूचनेनुसार किशन जी, भूपती, कादरी सत्यनारायणा यांच्यासोबत बसवराजू दंडकरण्यात तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या सीमाभागात सक्रिय झाला.

१९९२मध्ये बसवराजूला माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य करण्यात आले. या दशकात लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम म्हणजे एलटीटीई या संघटनेकडून माओवाद्यांना भूसुरुंग स्फोटाचे तंत्र शिकवण्यात आले होते. यासाठी एलटीटीईचे स्फोटक तयार करण्याचे प्रशिक्षण देणारे दंडकरण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा मुख्य समन्वयक बसवराजू होता. तो स्वत: स्फोटकनिर्मितीत निष्णात झाला. गुरिल्ला पद्धतीने हल्ला करण्यातही त्याने हातखंडा मिळवला. १९९२ ते २००४पर्यंत दंडकारण्यात गडचिरोली जिल्ह्यातील असरअल्लीसह काही पोलिस ठाणे लुटण्यात आले. याचा सूत्रधार बसवराजू होता. दंडकारण्यात जवानांवर सातत्याने झालेल्या हल्ल्यांमागे बसवराजूच होता.
Maharashtra TimesMonsoon 2025: यापुढे पाऊस ‘धडाधड’ कोसळणार! ‘हीट आयलंड इफेक्ट’चा परिणाम; तज्ज्ञांचे मत
चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर तिरुपतीजवळ झालेल्या हल्ल्याचा तसेच गृहमंत्री माधव रेड्डी यांची भूसुरुंगस्फोटात हत्या घडवण्यामागे बसवराजूच होता. २०१३ साली छत्तीसगडमधील सुकमा येथे काँग्रेसच्या रॅलीवर झालेल्या हल्ल्याचा कट बसवराजूनेच आखला होता.

माओवादी संघटनेचे यशस्वी नेतृत्व सांभाळणाऱ्या गणपतीने वाढलेल वय आणि प्रकृतीमुळे महासचिवपदाची जबाबदारी २०१८मध्ये बसवराजूकडे सोपवली होती. गणपती यांना पदमुक्त करण्याचा निर्णय संघटनेच्या केंद्रीय समितीच्या पाचव्या बैठकीत झाला होता. यानंतर बसवराजू उर्फ गंगण्णा हा माओवाद्यांच्या संघटनेचा प्रमुख झाला.
Maharashtra TimesChhattisgarh Encounter: माओवाद्यांचा कणा मोडला, बस्तरमध्ये म्होरक्या बसवराजू याच्यासह २७ माओवादी ठार
‘सेंट्रल मिलिटरी कमांड’ची सूत्रे हाती आली

दुर्गम भागातील आदिवासींशी बसवराजूचा दांडगा संपर्क होता. त्याच्या या पुढाकाराने १९९२ ते २००९ या काळात मोठ्या प्रमाणात आदिवासी युवक माओवादी संघटनेत दाखल झाले. २००४मध्ये भाकपा माओवादी संघटना अस्तित्वात आल्यानंतर या संघटनेचा प्रमुख असलेल्या गणपतीच्या सूचनेनुसार ‘सेंट्रल मिलिटरी कमांड’ ही माओवाद्यांची मिलिटरी पद्धतीची संघटना अस्तित्वात आली. याची सूत्रे बसवराजूकडे सोपवण्यात आली. दंतेवाडा जिल्ह्यातील ७६ जवान आणि राणी बुधली येथील घटनेत ५० जवान, गडचिरोली जिल्ह्यात २००९मध्ये ५२ जवान शहीद झाल्याच्या सर्वात मोठ्या घटना घडल्या. या घटनांचा सूत्रधार बसवराजू हाच होता.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा