वाशिममध्ये रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली असून तपासातून धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

पाशवी कृत्य अन् पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञात महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. महिलेचे डोके दगडाने अशा प्रकारे ठेचले होते की ओळख पटवणेही कठीण झाले होते. घटनास्थळावर रक्ताचा सडा, दारूच्या बाटल्या, पॅन्टचा बेल्ट आणि खाण्याचे साहित्य विखुरलेले होते. यावरून नराधमाने आधी महिलेवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर आपली ओळख लपवण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी तिची क्रूरपणे हत्या केल्याचा संशय बळावला होता.
अन् २४ तासांत आरोपीला बेड्या
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलिसांसमोर पहिले आव्हान होते ते म्हणजे मृत महिलेची ओळख पटवणे. तांत्रिक तपास आणि चौकशीअंती ही महिला वाशिममधील पंचशील नगर भागातील असून ती शहरात भटकंती करायची, असे निष्पन्न झाले.
आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी रेल्वे स्टेशन आणि परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पिंजून काढले. यामध्ये एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या रडारवर आली. तपासात हा इसम अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार येथील संतोष रामराव खंडारे असल्याचे समजले. पोलीस त्याच्या गावी पोहोचले, मात्र तो तिथे मिळून आला नाही. तो रेल्वेने अकोल्याला पसार झाल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी अकोला रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला आणि त्याला शिताफीने अटक केली.
आरोपीची कबुली, शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी संतोष खंडारे याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. “दारूच्या नशेत अत्याचार केला आणि त्यानंतर हत्या केली,” असे त्याने मान्य केले आहे. या संदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. बलात्कार झाला आहे की नाही, याचा अंतिम निष्कर्ष पोस्टमार्टम अहवालानंतरच अधिकृतपणे स्पष्ट होईल.”
या कारवाईमुळे वाशिम पोलिसांचे कौतुक होत असले तरी, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटकंती करणाऱ्या एका असहाय महिलेवर झालेल्या या अत्याचारामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

