Headlines

US India Conflict: अमेरिकेचे तीन प्रहार, इराणचा आयकॉनिक टॉवर जमीनदोस्त; भारताचे अब्जावधी रुपये धोक्यात


US India Conflict: अमेरिकेकडून गेल्या १० दिवसांपासून इराणच्या चाबहारवर हल्ले सुरू आहेत. चाबहारमधील आयकॉनिक टॉवर अखेर कोसळला आहे. यानंतर भारताचे कोट्यवधी रुपये संकटात सापडले आहेत.

trump and modi us
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेहरान: इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये अखेर या बंदरावरील आयकॉनिक मॅरिटाईम ट्रॅफिक कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त झाला. हा टॉवर पाडण्यासाठी अमेरिकेनं एक नव्हे, तीन हल्ले केले. पहिला हल्ला ८ जुलैला करण्यात आला. १५ जुलैला अमेरिकेकडून क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. पण १६ जुलैच्या रात्री भीषण हल्ल्यात अखेर हा टॉवर जमीनदोस्त झाला. चाबहार मार्गानंच पुढे होर्मुझच्या सामुद्रधुनीपर्यंत जाता येतं. चाबहारमधील ट्रॅफिक कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त झाल्यानं जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, खर्च वाढू शकतो. आखाताच्या बाहेर असलेल्या इराणच्या आर्थिक जीवनरेषेवर दबाव पडू शकतो.

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे बंदराच्या दोन मुख्य घाटांचं नुकसान झालं आहे. त्यात शहीद बेहेश्ती डॉकचाही समावेश आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर विकसित करण्यात आलेल्या वाहतूक सुविधेत भारताची भागिदारी आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात स्थानिक पोलीस स्टेशन डॉकचंही नुकसान झालं आहे. हल्ल्यांमुळे चाबहारमधील जवळपास निम्म्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अनेक भागांमधील बत्ती गुल झाली आहे.

चाबहारमध्ये भारताची प्रचंड गुंतवणूक आहे. इथे भारतानं १२० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास साडे ११ अब्ज रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांनी भारताची गुंतवणूक अडचणीत आली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात मॅरिटाईम ट्रॅफिक टॉवर कोसळला. हा टॉवर शाहिद बेहेश्ती टर्मिनलवर उभारण्यात आलेला आहे. या टर्मिनलची निर्मिती भारतानं केली आहे.

भारतानं चाबहार प्रकल्पात गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. २०२४ मध्ये इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडनं इराण सोबत १० वर्षांसाठी करार केला. या अंतर्गत ३७ कोटी डॉलर (३७० मिलियन डॉलर) गुंतवणूक करण्याची योजना आखण्यात आली. हे बंदर भारतासाठी अतिशय महत्त्वाचं आबे. कारण यामुळे अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पाकिस्तानला बाजूला सारुन भारत व्यापारी संबंध ठेवू शकतो. हिंदी महासागराला जोडून असलेला चाबहार हे इराणमधील एकमेव बंदर आहे.

चाबहार पोर्टमध्ये दोन टर्मिनल आहेत. शाहिद बेहेश्ती आणि शाहिद कलंतरी. या टर्मिनलमध्ये अनेक बर्थ आणि कार्गो सांभाळण्याच्या आधुनिक सुविधा आहेत. भारत सरकारची कंपनी इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड २०१८ पासून शहीद बेहेश्ती टर्मिनलचं कामकाज पाहात आहे. मे २०२४ मध्ये इराण सोबत १० वर्षांचा करार झाला. त्यानुसार IGPL ला या टर्मिनलचं जनरल कार्गो आणि कंटेनर टर्मिनल चालवण्याचं काम सोपवण्यात आलं.