Headlines

Uddhav Thackeray: सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलं अन् भाजपनं काय केलं? हिशोब होऊन जाऊ द्या! ठाकरेंचं आव्हान


Uddhav Thackeray: नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी बेमुदत उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना उबाठाकडून मुंबईत आंदोलन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारला लक्ष्य केलं.

uddhav vs modi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: रोजगार, शिक्षण न देणारं दळभद्री सरकार बदललंच पाहिजे. तुम्ही आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते व्हा. तुमच्या मनात पेटलेली आग सत्तांतर होईपर्यंत कायम धगधगती राहायला हवी. त्या आगीनं हुकूमशाही सरकार भस्म व्हायला हवं, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारला लक्ष्य केलं. मुंबईत दादरमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आयोजित आंदोलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वांगचुक यांना पाठिंबा जाहीर केला. सोबतच केंद्र सरकारचा समाचार घेतला.

नीट पेपरफुटी विरोधात पर्यावरणादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. तब्बल ३ आठवड्यांपासून वांगचुक उपोषणाला बसले आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र अद्याप तरी सरकारच्या वतीनं त्यांच्या सोबत कोणीही संवाद साधलेला नाही. पोलिसांनी वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून ताब्यात घेतलं असून वांगचुक यांचं उपोषण तिथूनही सुरू आहे. या सगळ्यावरून ठाकरेंनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.

सोनम वांगचुक यांनी देशासाठी दिलेलं योगदान उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ‘सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलं आणि या दळभद्री सरकारनं देशाला काय दिलं, याचा हिशोब होऊन जाऊ दे. बर्फात, कडाक्याच्या थंडीत देशांच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी सोलर कॅम्प उभारले. लडाखमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्यानं कृत्रिम आईस माउंटन तयार केला. त्याच सोनम यांना केंद्र सरकार देशद्रोही ठरवतंय,’ अशा शब्दांत ठाकरेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

याचवेळी ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत , वरिष्ठ नेते दत्तात्रय होसबळे यांच्या विधानांचा संदर्भ दिला. पाकिस्तान सोबत भारतानं चर्चा करायला हवी, असं विधान होसबळे यांनी केलं होतं. त्याला भागवत यांनीदेखील सहमती दर्शवली होती. जे लोक आमच्या सैनिकांच्या आयुष्यावर उठलेत, त्यांच्यासोबत चर्चा करण्याची यांची तयारी आहे. पण ज्या व्यक्तीनं आपल्या सैनिकांची सेवा केली. लष्करासाठी योगदान दिलं. त्यांच्याशी चर्चा करायला मात्र हे सरकार चर्चा करण्यास तयार नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी संघासह भाजपवर तोफ डागली. आज जे देशात सुरू आहे, तेच संघाच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र आहे का, असा सवाल त्यांनी मोहन भागवत यांना विचारला.

सोनम वांगचुक यांचं आंदोलन झाकण्याचा प्रयत्न केलात, तरी सत्य लपणार नाही. तुमच्या पापांवर पांघरुण घालता येणार नाही, अशा शब्दांत ठाकरेंनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी १५ वर्षांपूर्वी झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण करून दिलीय. अण्णा हजारे उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या आंदोलनाला देशभरात प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी कोणीही त्यांना देशद्रोही किंवा चीनचा हस्तक म्हटलं नव्हतं. त्यावेळी सत्तेत असलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अण्णांशी चर्चा करायला विलासराव देशमुखांना पाठवलं होतं. पण आता सत्तेत असलेल्या सरकारकडून संवाद साधण्याऐवजी दडपशाही सुरू असल्याची टीका त्यांनी केली.