२०२४ अन् २०२६ चे टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार राहिलेले क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांचा कार्यकाळ अखेर संपला. भारतीय संघाला निरोप देताना त्यांनी कोणाचे आभार मानले?

नोव्हेंबर २०२१ मध्ये झाला होता प्रवेश; सुभादीप घोष घेणार जागा
टी. दिलीप नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० (T20I) मालिकेनंतर त्यांचा करार न वाढवल्याने ते भारतीय संघापासून वेगळे झाले आहेत. त्यांच्या जागी आता सुभादीप घोष यांची भारताचे नवीन फील्डिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी घोष भारतीय संघासोबत श्रीलंकेला रवाना होतील.
टी. दिलीप यांची भावुक इन्स्टाग्राम पोस्ट
सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून भावना व्यक्त करताना टी. दिलीप यांनी लिहिले, “पाच वर्षे… इतका महत्त्वाचा प्रवास शब्दांत मांडणे सोपे नाही. जेव्हा मी पहिल्यांदा या सेटअपमध्ये आलो होतो, तेव्हा माझा एकच उद्देश होता – दररोज माझे १००% देणे. क्रिकेट या खेळावर माझे मनापासून प्रेम आहे आणि फील्डिंग हाच या खेळासाठी योगदान देण्याचा माझा मार्ग होता. या अद्भुत संघाच्या प्रवासाचा भाग होण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
टी-२० वर्ल्ड कप ते चॅम्पियन्स ट्रॉफी; सुवर्ण क्षणांना उजाळा
भारतीय ड्रेसिंग रूममधील आठवणींना उजाळा देताना टी. दिलीप यांनी आपल्या कार्यकाळातील मोठ्या यशांचा उल्लेख केला. यामध्ये खालील प्रमुख विजयांचा समावेश आहे.
- आयसीसी टी-२० वर्ल्ड कप विजय (२०२४ आणि २०२६)
- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजय (२०२५)
- आशिया कप विजय (२०२३ आणि २०२५)
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) आणि आयसीसी पुरुष वन-डे वर्ल्ड कप (२०२३) मधील उपविजेतेपद
राहुल द्रविड, गौतम गंभीर आणि सर्व कप्तानांचे मानले आभार
आपल्या पोस्टमध्ये टी. दिलीप यांनी पूर्व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारतीय संघाच्या वेगवेगळ्या कर्णधारांचे विशेष आभार मानले. त्यांनी लिहिले, “माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि भारतीय क्रिकेटची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक आभार! राहुल द्रविड आणि गौतम गंभीर, तुमच्या विश्वासाबद्दल धन्यवाद.
तुमच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर – तुमच्या सर्वांसोबत काम करणे आणि तुमच्या नेतृत्वात योगदान देणे हा माझा सन्मान होता. सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे मनापासून आभार. आपण एकत्र निर्माण केलेल्या या आठवणी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील.”

