मुंबई – राज्याच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत… महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे उद्या त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. . मात्र या उमेदवारीइतकीच चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचीही रंगली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी मंगळवारी सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. महायुतीच्या वतीने उमेदवारी दाखल करण्यात आल्याने उपसभापतीपदावर त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन अहिर यांच्यावर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, महायुतीला दोन्ही सभागृहात बहुमत असल्यामुळे उद्या सचिन अहिर यांची उपसभापती म्हणून निवड होईल. केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सचिन अहिर म्हणाले, शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपसभापती पदावर संधी देऊन माझा सन्मान वाढवला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची संधी मला या माध्यमातून मिळाली आहे. हे काम करत असताना पक्ष संघटना कशी वाढेल, ग्रामीण भागातील ताकद कशी वाढेल, यासंबंधीचं काम मी सुरु करणार आहे.
आता एकनाथ शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती पूर्ण ताकदीने मी पार पाडणार आहे. मी कोणताही पक्ष सोडलेला नाही, तांत्रिक बाबी मी वेगळ्या व्यासपीठावर बोलेन. असं म्हणत आमदार सचिन अहिर यांनी कुठेही प्रवेश केला नसल्याचं सांगितलं.
