Headlines

Ramdas kadam acquitted after 20 years case filed in karnataka due to belgaum speech; बाळासाहेबांचा आदेश, कर्नाटकात झंझावाती भाषण अन् गंभीर गुन्हा दाखल; रामदास कदमांची २० वर्षानंतर मुक्त


Ramdas Kadam: तब्बल २० वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

ramdas kadam
बाळासाहेबांचा आदेश, कर्नाटकात झंझावाती भाषण अन् गंभीर गुन्हा दाखल(फोटोLipi)
प्रसाद रानडे, रत्नागिरी: बेळगांव, धारवाड, निपाणी, बिदरीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी २००६ साली शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांना बेळगावमध्ये पाठवले होते. त्यावेळी बेळगांव खानापूर येथे प्रचंड मोठी जाहीर सभा झाली होती. त्याआधी बेळगांव येथील मराठी महापौरांच्या तोंडाला काळे फासण्याचे कामही काही कन्नड गुंडांनी केले होते. या धर्तीवर शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार बेळगांव येथे जाऊन रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील यांनी सभा घेतली होती. यावेळी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलग २० वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल लागला असून सुनावणी पूर्ण झाल्यावर ११ ऑगस्ट रोजी खानापूर न्यायालयाकडून पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे २००६ साली सीमा प्रश्नासंदर्भात मेळावा घेतला होता. यावेळी महाराष्ट्रातील नेते या मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्यात रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंडसंहिता कलम १५३ आणि १५३/ए अन्वये हा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण होऊन खानापूर न्यायालयाने रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची मंगळवारी निर्दोष मुक्तता केली आहे. वकील शामसुंदर पत्तार, हेमराज बेंच्चन्नावर यांनी त्यांच्या वतीने काम पाहिले.

दरम्यान, रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील हे आधी सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे खानापूर न्यायालयाने या दोघांवर अटक वॉरंट जारी केले होते. यावेळी समिती कार्यकर्ते यशवंत बिरजे आणि महादेव घाडी हे कोर्टात जामीन राहिले होते. त्यानंतर खानापूर न्यायालयाने रू. १० लाख रूपयांच्या जामीनावर रामदास कदम यांना सोडले होते. आता या दोन्ही नेत्यांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे.