पुणे : कॉग्रेसकडे सुरुवातीपासून सर्वसमावेशक पक्ष म्हणून पाहिले गेले. भाजप मात्र प्रारंभी सर्वांना सोवळ्या ओवळ्यातला पक्ष वाटायचा. उच्चभ्रू समाजघटकांव्यतिरिक्त इतर समाज घटकांमध्ये पक्षाला फारसा जनाधार नव्हता. त्यामुळे एकूणच पक्षवाळीलाही मर्यावा होत्या. त्यातूनच जन्माला आला माधवम् पॅटर्न. माधवम् म्हणजे माळी, धनगर, वंजारी व मराठा. महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या समाज घटकांमध्ये पक्ष रुजविण्याच्या दृष्टीने भाजपाने सुरुवात केली.
त्यातूनच गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, अण्णा डांगे, ना. स. फरांदे यांसारखे नेतृत्व पुढे आले. स्वाभाविकच पक्षाचा विविध समाज घटकांमध्ये जनाधार वाढला. अलीकडे तर ओबीसींचा पक्ष अशीच भाजपाची छबी तयार झाली आहे. भाजपानेही विविध समाजातील लोकांना प्रतिनिधीत्व देत संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आजवर महाराष्ट्रातील सत्ताकारण हे प्रामुख्याने मराठा समाजाभोवती फिरत आले. परंतु, भाजपाने मराठा समाजाला वा या समाजातील नेत्यांना काबूत ठेवतानाच इतर समाज घटकांनाही ताकद देण्याचे काम केले.
हे सगळे अतिशय नाजूकपणे व कौशल्याने करण्याची किमया भाजपाने साधली. तरीही भाजपात पश्चांतर्गत जातीय संघर्ष सुरू असल्याचे म्हटले जाते. भाजपमध्ये मराठा नेतृत्वाची गळचेपी सुरू असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरूच असतात किंवा मराठ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी ओबीसींचा वापर केला जात असल्याचेही बोलले जाते.
पक्षात असे आंतरिक संघर्ष असतीलही. किंबहुना, पुण्यातील ‘सारथी’च्या कार्यक्रमातील उघडउघड नाराजीनाट्याने जात वास्तवच ठळक झाल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार सोहळा होणार होता. त्याकरिता खासदार, आमदारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी स्वीय सहाय्यक व विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हेही व्यासपीठावर उपस्थित होते. परंतु, पहिल्या रांगेत बसण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. ‘कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर राजशिष्टाचारानुसार माझी जागा निश्चित करण्यात आली होती.
मात्र, हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे. तुम्ही मागे बसा, नरेंद पाटील पुढे बसतील,’ असे अभिमन्यू पवार यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा मेधाताईनी केला. पवार यांच्या निवडणुकीत मी ब्राम्हण समाजाचा मेळावा घेऊन त्यांना कशी साह्यभूत भूमिका घेतली, याची आठवणही त्यांनी करून दिली. दुसऱ्या बाजूला ‘नरेंद पाटील हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपण दोघे मागे बसू, असे मी म्हणालो होतो.
यात कोणताही जातीचा विषय वा वाद नाही,’ असे स्पष्टीकरण अभिमन्यू पवार यांनी दिले. त्यामुळे हा वाद नेमका जागेवरून की जातीवरून, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. नेमके कारण काहीही असले, तरी यातून पक्षाची शोभा गेली, हे नक्की. मराठा समाजाचा मेळावा आहे.
म्हणून एखाद्या अन्य जातीच्या नेत्याला हटकणे योग्य नाही. तर पक्षातील रुसवे फुगव्यांबरोबरच हे नाराजी नाट्य चव्हाट्यावर आणत त्याला जातीय फोडणी मिळणे, हेही पक्षशिस्तीला गालबोट लावणारे म्हणता येईल. म्हणून या न जाणाऱ्या ‘जात पॅटर्न’ वरही पक्षाला काम करावे लागेल.
भारतीय जनता पक्ष हा एकेकाळी शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, ही ओळख पुसण्यासाठी भाजपाने राबवलेला ‘माधवम् पॅटर्न बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून येते, स्वाभाविकच नव्या भाजपाने ओबीसींचा पक्ष म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे,
तथापि, पुण्यातील ‘सारथी च्या कार्यक्रमात भाजपाच्या आमदार-खासदारांमध्ये नाराजीनाट्य रंगावे आणि या साऱ्याला जातीय फोडणी मिळावी, हे काही भाजपासारख्या पक्षासाठी चांगले लक्षण म्हणता येणार नाही.
