Headlines

Pune Crime: …तर सियादेखील केतनसोबत दरीत पडली असती! गडबड होण्याचा धोका; मग ‘बसण्याचा’ प्लान ठरला


Pune Crime: लोहगड्याच्या कड्यावरुन पडून बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू झाला. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत.

pune crime case (2)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हत्येचा कट नियोजितबद्ध पद्धतीनं रचला होता. चेतनला पाहून सियाचं अचानक बसणं हा केवळ हल्ल्याचा इशारा नव्हता, तर स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या रणनीतीचा भाग होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया कोणत्या तरी बहाण्यानं, (उदाहरणार्थ, पाणी पिणं किंवा बुटाची लेस बांधणं) खाली बसते. सिया खाली बसताच चेतन मागून येऊन केतनला धक्का देतो. त्यानंतर तो दरीत कोसळतो. केतनला धक्का दिल्यावर तो स्वत:ला वाचवण्यासाठी सियाला पकडण्याचा प्रयत्न करेल आणि केतन सोबत सियादेखील दरीत पडेल, अशी शक्यता आरोपींना वाटत होती. हा धोका टाळण्यासाठी चेतन धक्का देत असताना सिया खाली बसेल, अशी योजना आखण्यात आली. याचा अर्थ धक्का देताना काय होऊ शकतं, याची तयारी करण्यात आली होती.
Maharashtra TimesPune Crime : सिया-चेतनने पार ‘दृश्यम’ सारखं डोकं लावलं, पण पोलिसांनीही चेकमेट केलंच, केसमधील निर्णायक पुरावा जप्त
चेतननं ९० किलोमीटर अंतर स्कूटरनं कापलं
चेतन चौधरीचं त्याची ओळख लपवून टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. तो पुण्याहून जवळपास ९० किलोमीटर दूर असलेल्या लोहगडावर कारच्या ऐवजी स्कूटरनं पोहोचला. टोल प्लाझावर वाहनाची नोंद होऊ नये यासाठी चेतननं पुरेपूर काळजी घेतली. चेतननं वापरलेली स्कूटर जप्त केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चेतननं किल्ल्यावर पोहोचताच आपला वेषांतर केलं. त्यानं हुडी घातली आणि गड चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यानं हुडी काढली आणि काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये वावरला. येताना त्यानं पुन्हा हुडी परिधान केली. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी चेतननं या क्लृप्त्या वापरल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra TimesPune News : केतन अगरवाल मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट, सियाच्या वकिलांचा वेगळाच युक्तिवाद, कोर्टात काय-काय घडलं?
रविवारी पोलिसांनी सिया गोयलला लोहगडावर नेलं. तिथे डमीच्या मदतीनं संपूर्ण घटनाक्रम पुन्हा करण्यात आला. १८ जूनला केतन अग्रवालला कड्यावरुन ढकलण्यात आलं. त्या दिवशीचा नेमका घटनाक्रम काय होता, आरोपींची त्यांचा कट कशाप्रकारे प्रत्यक्षात आणला, हे पोलिसांनी जाणून घेतलं.

केतनच्या हत्येआधी किल्ल्यावर जाऊन उपयुक्त जागा हेरुन ठेवल्याची आणि कट यशस्वी करण्यासाठी सराव केल्याची कबुली आरोपींनी पोलीस चौकशीत दिली आहे. आरोपींना सराव नेमका कुठे केला, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा