Headlines

Nepal Flood: हिमालयातला हाहाकार – nepal flash flood explained what triggered glacier break or earthquake


Nepal Flood: नेपाळ हा छोटासा देश असल्याने त्या सरकारला एकट्याने हे आव्हाने पेलणे अवघड दिसते. मात्र, भारतासह जगभरातून मदतीचा ओघ जपानकडे येत आहे.

हिमालयातला हाहाकार
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
नेपाळ आणि तिबेटमध्ये हिमनदी कोसळून आलेला महापूर, ही थरकाप उडवणारी आणि मानवी प्रगतीने निसर्गावर मात केल्याच्या गर्वाचा क्षणार्धात कडेलोट करणारी दुर्घटना आहे. यामध्ये सुमारे दोनशे जणांचा मृत्यू झाला असून, हा आकडा आणखी वाढू शकतो. त्याबरोबरच दीड हजार जण बेपत्ता आहेत; त्यामध्ये महाराष्ट्रातील आणि देश-विदेशांतील पर्यटक-यात्रेकरूंचाही समावेश आहे. या भागात अचानक पूर येऊन दरडी कोसळल्या आणि हिमालयातील एका हिमनदीचा भागही कोसळला. त्यामुळे डोंगरकडे आणि बर्फाचा अजस्र ढिगारा नदीत वाहू लागला. ही पाणी व चिखलाची महाभिंत भोटे कोशी आणि पुढे त्रिशुली नद्यांच्या पात्रातून वाहू लागली. तिचा वेग आणि दाब इतका प्रचंड होता, की स्थानिक भूकंपमापक यंत्रणेवर ५.२ रिश्टर स्केलच्या धक्क्यांची नोंद झाली. या महादुर्घटनेत २९ मोठे पूल आणि ४० किलोमीटरचे रस्ते वाहून गेले आहेत.

चार जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले असून, काठावरील अनेक गावांचे नकाशावरील अस्तित्वच पुसून गेले आहे. याच नद्या पुढे गंगेला मिळत असल्याने, आपल्याकडे बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्येही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. माध्यमे आणि समाजमाध्यमांतून प्रसृत झालेले या घटनेचे व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवतात. त्यामागे नैसर्गिक प्रकोप असला, तरी हवामान बदलांचाही त्यात नक्कीच वाटा आहे. भारतीय सीमांलगत भागातील या दुर्घटनेतून निसर्गाने हा मानवाला दिलेला इशाराच म्हणावा लागेल.

तिबेट आणि नेपाळच्या सीमेवरील या भागात दरडी आणि एका हिमनदीचा भाग कोसळून भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांच्या खोऱ्यात हाहाकार उडाला. हा भाग अत्यंत दुर्गम-अरुंद असून, नद्यांचे उतारही अतिशय तीव्र आहेत. त्यामुळे तेथून वाहणाऱ्या पाण्यापुढे कोणतेही पूल-इमारती टिकणे अशक्य होते. ही नदी नेपाळमध्ये नारायणी आणि भारतात गंडक नदी म्हणून ओळखली जाते आणि पुढे गंगेला मिळते. त्यामुळेच या लोंढ्याचा जोर काहीसा ओसरला असला, तरी उत्तर बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काठावरच्या जिल्ह्यांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कैलास-मान सरोवर यात्रेच्या मार्गात हा परिसर आहे; तसेच पावसाळ्याच्या उत्तरार्धात स्वच्छ हवामानाच्या शक्यतेमुळे गिर्यारोहण मोहिमांसाठी तो प्रसिद्ध असल्याने तेथे पर्यटक व यात्रेकरूंची संख्या मोठी होती. या दुर्घटनेबाबत चीनने वेळीच सावधगिरीचा इशारा न दिल्याचा आरोप काही नेपाळी अभ्यासकांकडून झाला; मात्र नेपाळच्याच हद्दीत दरडी कोसळल्याचे चीनचे म्हणणे आहे.

वाद काहीही असले, तरी या दुर्घटनेतून धडा घेऊन आंतरराष्ट्रीय पूर्वसूचना यंत्रणा उभारण्याची गरज असून, भारतानेही त्यात सहभागी होणे, ही काळाची गरज आहे. आता नागरिक आणि पर्यटकांचे बचावकार्य, हा तातडीचा टप्पा असून, सर्वत्र निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य साफ करणे हे मोठे आव्हान आहे. त्यानंतर या उद्ध्वस्त झालेल्या गावांची उभारणी, रस्ते-वीजकेंद्रे अशा पायाभूत सुविधा पुन्हा उभ्या कराव्या लागतील.

नैसर्गिक प्रकोप म्हणून अशा दुर्घटनांमागील अन्य कारणे नजरेआड करण्याजोगी नक्कीच नाहीत. गेल्या काही काळात हवामान बदलांमुळे हिमालयाच्या परिसरातील तापमान वाढत आहे. हिमनग- हिमनद्या ठिसूळ होत आहेत. त्यातून अनेकदा अचानक पूर (फ्लॅश फ्लड), दरडी कोसळणे व अतिवृष्टीसारख्या घटनाही घडल्या आहेत. जोडीने हिमालयाच्या कुशीत रस्तेनिर्मिती, जलविद्युत प्रकल्प आणि नद्यांचे प्रवाहसुद्धा अडवले जात आहेत. त्यासाठी रस्तेरूंदी, सुरुंगस्फोट आणि उत्खननामुळे कमकुवत झालेल्या पर्वतांमधून दरडी कोसळतात.

भारतातही केदारनाथ किंवा चमोलीसारख्या दुर्घटनांच्या आठवणी ताज्या आहेत. या घटनांमधून योग्य धडे घेण्याची वेळ आली आहे. विकासाचा अट्टहास पर्यावरणाचा नाश करून अंतिमत: मानवाच्याच मुळावर उठतो, याची साक्ष देणाऱ्या या दुर्घटना आहेत. त्यामुळे जंगलतोड, खोदकाम आणि नद्यांच्या काठी अनियोजित विकास यांचा फेरविचार केला पाहिजे. हिमालयाच्या परिसरातील वीज प्रकल्पांचे तातडीने सुरक्षा ऑडिट आणि तातडीने सावधानतेचे इशारे देणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील. निसर्गावर मात केल्याचा आनंद क्षणिक असतो आणि त्याला निसर्गाने दिलेले उत्तर परवडणारे नसते, याचे भानच मानवजातीला तारू शकेल.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा