Headlines

Mohan Bhagwat RSS Speech at IIMUN talks on Gen Z Same Gender Marriage Amruta Fadnavis reacts; समलिंगी विवाहावर कायदा हवा, समाजालाही तयार करावं लागेल, मोहन भागवत यांचं मत; अमृता फडणवीस म्हणतात या पिढीत स्वप्नपूर्तीची क्षमता


Mohan Bhagwat IIMUN Speech : ‘तरुणांच्या तक्रारी खऱ्या असून त्यांना ‘देशविरोधी’ म्हणून दूर लोटू नये. ते आपलेच आहेत, या भावनेतून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’ अशा भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या

Mohan Bhagwat Amruta Fadnavis Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘आजचे तरुण उत्तरे शोधत आहेत. त्यांना प्रेम, विश्वास आणि संवाद हवा आहे. ते केवळ विरोधासाठी आवाज उठवत नाहीत; व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रश्न विचारत आहेत. तरुणांनी मतप्रदर्शन करणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे’, अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी मांडली. ‘आयमन’ या संस्थेच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित परिषदेत मोहन भागवत यांनी ‘जेन-झी’ व ‘जेन-अल्फा’ पिढीशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

मत मांडणे लोकशाहीसाठी आवश्यक

आंदोलनांच्या संदर्भात सरसंघचालकांनी लोकशाहीतील संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘लोकशाहीत आंदोलन हा संवादाचा मार्ग आहे. आंदोलनातून सहमती निर्माण झाली पाहिजे. संवाद थांबला की, संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे तरुणांनी प्रश्न विचारणे आणि मत मांडणे हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे’, असे ते म्हणाले. ‘तरुणांच्या तक्रारी खऱ्या आहेत. त्यांना ‘देशविरोधी’ म्हणून दूर लोटू नये. ते आपलेच आहेत, या भावनेतून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असेही भागवत यांनी नमूद केले.

शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी देशात सुमारे दहा लाख शिक्षकांची पदे रिक्त असल्याचा उल्लेख केला. ‘शिक्षण ही प्रत्येकाच्या आयुष्याची गरज आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था उभी राहिली पाहिजे. शिक्षणावरील खर्च सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या सहा टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी योग्य आहे’, असे भागवत म्हणाले.

Maharashtra TimesNagpur Crime : सरकारी अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार, गुप्तांगात जखमा, ‘इन्स्टा फ्रेण्ड’ आरोपीला लॉकअपमध्येही मऊसूद बेड हवा

समलिंगी विवाहांवर कायदा हवा

सोशल मीडियावरील ध्रुवीकरण आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत त्यांनी सावधगिरीचा सल्ला दिला. ‘सोशल मीडियावर अनेकदा खोटी माहिती पसरवली जाते. त्यामुळे तिथे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. स्वतःचा विवेक वापरा आणि माहितीची पडताळणी करा. समाज ज्या मूल्यांना स्वीकारतो, त्याच आधारावर कायदे प्रभावी ठरतात. त्यामुळे समाजात चांगले आदर्श उभे राहणेही महत्त्वाचे आहे’, असे सरसंघचालक म्हणाले.समलिंगी विवाहाच्या प्रश्नावर त्यांनी समाजाच्या तयारीचा मुद्दा उपस्थित केला. ‘अशा विषयांवर कायदा करण्याबरोबरच समाजालाही तयार करावे लागेल’, असे त्यांनी नमूद केले. महिलांच्या भूमिकेबाबत बोलताना स्त्री आणि पुरुष समान असून एकमेकांना पूरक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘देशाचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता’ : अमृता फडणवीस

‘आजची युवा पिढी भविष्यातील मोठी शक्ती आहे. देशाचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता या पिढीत आहे. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरच्या दिशेने नेण्यासाठी जेन-झी आणि जेन-अल्फाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे तरुणाईचा विचार, दृष्टिकोन आणि अपेक्षा जाणून घेणे आवश्यक आहे’, असे मत अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले. सरसंघचालकांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, अनुभवी व्यक्तींनी आपले अनुभव नव्या पिढीसमोर मांडून त्यांना प्रगतीसाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. तरुणांना स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक बळ सरकार आणि विविध संस्था एकत्रितपणे देऊ शकतात.’

Maharashtra TimesKerala Flood : बाबांच्या चेहऱ्यावरचं कापड काढा ना, शेवटचं पाहायचंय; पुरातून शेतकऱ्याला वाचवताना बाप गेला, मुलांची आर्त विनवणी ऐकून सीएमही गहिवरले

‘संवाद आवडला; पण काही उत्तरे अनुत्तरितच’

मोहन भागवत यांच्या संवादानंतर उपस्थित तरुणांनी मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गुजरातहून आलेला १५ वर्षीय चिरायू पंजारकर म्हणाला, ‘काही मुद्द्यांवरील भूमिका पटल्या; मात्र काही उत्तरे राजकीय वाटली. जेन-झीविषयी आज संवाद होत आहे, पण दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान तरुणांवर लाठीमार झाला, तेव्हा असा संवाद का झाला नाही, हा प्रश्न कायम आहे.’ दिल्लीची अर्णा मित्तल हिनेही मुलाखतीबाबत प्रश्न उपस्थित केला. ‘मुलाखतकारांनी महत्त्वाचे प्रश्न विचारले; मात्र काही उत्तरे थेट नव्हती. शिक्षणावर सहा टक्के खर्चासारख्या घोषणा प्रत्यक्षात उतरल्या, तरच त्या भूमिकांवर विश्वास बसेल. मुलाखत स्क्रिप्टेड होती की, नाही हे सांगता येणार नाही. मात्र, प्रत्यक्ष कृतीतूनच त्याचे उत्तर मिळेल’, असे ती म्हणाली. उपस्थित काही विद्यार्थ्यांनी भागवत यांनी संवाद साधण्याचा आणि तटस्थ राहण्याचा प्रयत्न केल्याचे मान्य केले. मात्र, अनेक संवेदनशील प्रश्नांवर अधिक स्पष्ट आणि थेट भूमिका अपेक्षित होती, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.