Headlines

Indian Sailor Dies: किडनी, हृदय, फुफ्फुस..; व्हेनेझुएलाच्या समुद्रात भारतीय खलाशासोबत घातपात? बॉडीमधून 21 अवयव गायब


Indian Sailor Dies: जहाजावर काम करणाऱ्या भारतीय तरुणाचं अकाली निधन झालं. पण शिपिंग कंपनीनं कुटुंबाला नीट माहिती दिली नाही. यानंतर तरुणाचं पार्थिव मायदेशी आणलं गेलं. तेव्हा कुटुंबाला धक्काच बसला.

indian sailor
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लखनऊ: व्हेनेझुएलात जहाजावरील ड्युटी दरम्यान राकेश चौहान यांचा संशयास्पद शेवट झाला. नोव्हेंबर २०२५ मध्ये फिटर म्हणून काम सुरू करणाऱ्या राकेश यांचा ७ मे रोजी मृत्यू झाला. यानंतर ४ जूनला त्यांचं शव घरी आणण्यात आलं. आधी अपघात, मग हृदय विकाराचा झटका आल्यातं सांगणाऱ्या शिपिंग कंपनीनं नातेवाईकांना न सांगता शवविच्छेदन प्रक्रिया करुन घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. त्यात राकेशच्या शरीरातील सर्व महत्त्वाचे अवयव गायब असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या प्रकरणातील संशय वाढला आहे.

राकेश चौहान मूळचे उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्याचे रहिवासी होते. भलुअनीत भगवानपुरात त्यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. ‘७ मे रोजी आम्हाला फोन आला होता. राकेश जहाजावर पडल्यानं त्याला दुखापत झाली असल्याचं सांगण्यात आलं. पण पुढच्याच दिवशी कंपनीनं हृदय विकाराचा झटका आल्याचं सांगितलं,’ अशी माहिती राकेश यांचे वडील रामदेव चौहान यांनी दिली.
Maharashtra TimesDoctor Dies In Car: पेट्रोल संपलं अन् डॉक्टरचा शेवट; रस्त्याच्या कडेला कारमध्ये बॉडी सापडली, पोलिसांनी गूढ उकललं
राकेश यांची पत्नी रंजना आणि वडील मुंबईस्थित कंपनीच्या कार्यालयात पोहोचले. आठवड्याभरात राकेश यांचं पार्थिव घरी पाठवण्यात येईल, असं त्यांना सांगण्यात आलं. महिन्याभरानंतर ४ जूनला राकेश यांचं शव देवरियाला पोहोचलं. पण कंपनीनं मृत्यूमागील नेमकं कारण किंवा आधी करण्यात आलेल्या शवविच्छेदनाची कोणतीही लेखी माहिती कुटुंबाला दिली नाही.

घरी पोलिसांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी आधीच शवविच्छेदन झालं असल्याचं सांगून पुन्हा शवविच्छेदन करण्यास नकार दिला. यानंतर जिल्हाधिकारी मधुसूदन हुलगी यांच्या आदेशावरुन डॉक्टरांनी पुन्हा शवविच्छेदन केलं. तेव्हा त्यांना धक्काच बसला. राकेश यांच्या शरीरातील किडनी, हृदय, फुफ्फुसासह २१ अवयव गायब होते. व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यासाठी शरीरात काही शिल्लकच राहिलेलं नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगणं अवघड झालं.
Maharashtra Timesकॅबमध्ये प्रेम फुललं, लग्नासाठी घरातून पळाले; तरुणीचा होमस्टेमध्ये गूढ शेवट, BF बेशुद्ध
विमा कंपनीकडून मोठी रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी आणि पुरावे मिटवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप राकेश यांचे सहकारी घनश्याम सिंह आणि कुटुंबियांनी केला. राकेश यांची हत्या करुन त्यांच्या अवयवांची तस्करी करण्यात आल्याचा संशय कुटुंबाला आहे. पीडित कुटुंबाकडून आता न्यायाची मागणी केली जात आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई व्हावी आणि आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी कुटुंबानं केली आहे. यासाठी पीडित कुटुंब भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा